एक थोर भारतीय, अस्पृश्यांचे नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार या विविध नावाने परिचित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी हे लष्करात सुभेदार मेजर होते. भीम जन्मभूमी हे मध्य प्रदेश राज्यातील डॉ. आंबेडकर नगर (पूर्वी महू) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असलेले एक स्मारक आहे.
१४ एप्रिल १८९१ रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात भीमाबाई व रामजी बाबा यांचे पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. (महू गावात लष्करी छावणी असल्याने त्या स्थानाला Military Headquarters of War-MHOW हे नाव होते. रामजी लष्करातून निवृत्त झाल्यावर कुटुंबासह नोकरीसाठी साताऱ्यास आले. त्यामुळे आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यास झाले. आंबेडकर सहा वर्षांचे असतानाच त्यांची आई भीमाबाई यांचे निधन झाले. बाबासाहेबांचे पुढील सर्व पालनपोषण वडील रामजी व त्यांची बहीण मीराबाई ह्यांनी केले. आंबेडकरांना बालपणापासूनच अगदी छोट्या छोट्या समस्यांना सामोरे जावे लागत असत. आपल्या परिस्थितीची जाणीव त्यांना असल्याने ते एकाग्र असायचे. बिकट परिस्थितीतून जीवन जगत असताना देखील त्यांनी शैक्षणिक जीवनाचा संघर्ष देखील युद्ध पातळीवर केला. आंबेडकरांचे माध्यमिक विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. आं
आंबेडकर हे भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज या गुरूंसह थोरांच्या विचारावर आयुष्याचे मार्गक्रमण करत. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, समाजासाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. १९५६ मध्ये त्यांनी हिंदुस्तानातच उगम पावलेल्या व हिंदू विचाराशी संलग्न असलेला बौद्ध धम्म स्वीकारला व लक्षावधी सोबतींना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
एकीकडे सातत्याने भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, असे नेहमीच आपल्या आजूबाजूला बोलले जाते व त्यासाठी दर पाच वर्षांनी होणाऱ्या आणि यशस्वीपणे पार पडणाऱ्या निवडणुकांचे उदाहरण दिले जाते. दुसरीकडे आपल्या देशात लोकशाही मूल्ये अजून रुजलीच नाहीत, असेही आजूबाजूला नेहमीच बोलले जाते व त्यासाठी देशांमध्ये नेहमी होणारे जातीय, धार्मिक, भाषिक ताणतणाव यांची उदाहरणे दिली जातात. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस गोंधळून जातो. आपल्याकडे प्रत्येक माणूस कायदेशीर पातळीवर समान आहे; पण व्यवहारात मात्र ते दिसत नाही, त्यामुळे तर अधिकच गोंधळ उडून जातो. एक माणूस, एक मत आणि एक मूल्य या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठीच असतात, असाच सर्वसामान्य माणसांचा समज झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेला इशारा देत म्हटले होते की, २६ जानेवारी १९५० ला परस्पर विरोधाने भरलेल्या जीवनात आपण प्रवेश करणार आहोत. या दिवसापासून राजकीय बाबतीत आपणाला समता दिसणार आहे; पण सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आपणामध्ये असमानता राहणार आहे. सामाजिक आणि आर्थिक बाबतीत समता प्रस्थापित करण्याची टाळाटाळ आपण आणखी किती दिवस करणार आहोत? ही टाळाटाळ आपण जर पुष्कळ काळ चालू ठेवली तर आपल्या राजकीय लोकशाहीचे जावित धोक्यात येईल. ही विसंगती आपण नष्ट केली पाहिजे.
आज आपल्या आजूबाजूला पाहिले तर झपाट्याने जातीयवाद तसेच आर्थिक व सामाजिक विषमता वाढते आहे. तसेच देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्यामुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जात आहेत. आर्थिक संकटामुळे कामगार-शेतकरी देशोधडीला लागत आहेत. मागील काही वर्षांपासून लोकशाही संकटाचा प्रश्न भारतावरच नव्हे तर एकूण सगळ्या जगात तीव्र झाला आहे. वाढणारी हिंसा, पूर्वग्रह, गैरसमज, धर्माधता, दहशतवाद या सगळ्यांमुळे लोकशाहीचे भविष्य काय असेल, असा प्रश्न आज निर्माण झाला आहे.
डॉ. आबेडकरांनी सामाजिक-आर्थिक लोकशाहीची केलेली मांडणी भारतालाच नव्हे तर एकूणच जगाला दिशा देऊ शकते, असे मला वाटते. जगात सगळीकडेच स्थलांतरित आणि विस्थापितांचे लोंढे चर्चेचा विषय बनले आहेत. या स्थलांतराच्या निमित्ताने अनेकांना जागतिक भांडवलशाहीचे संकट, वसाहतवादाचे परिणाम, रोजगाराचा प्रश्न, दहशतवादाचा प्रश्न आणि धार्मिक – सांस्कृतिक संघर्ष अशा अनेक बाबींवर जागतिक पातळीवर चर्चा घडवून आणली जात आहे. या आंबेडकरांच्या अखंड विचारधारेला लक्षात घेता पूर्णविराम शक्य नाही.
६ डिसेंबर, १९५६ ला बाबासाहेबानी अखेरचा श्वास घेतला. इ. स. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
- अंकुश चिनकरे
अणदूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद
मो. ९८ ९०७ ९०७ ६४