उस्मानाबाद, दि.17 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाती परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालकपदाची सुत्रे डॉ.योगेश नारायण पाटील यांनी स्विकारली आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर आत मार्चमध्ये निवड करण्यात आलेले सातही संवैधानिक अधिकारी आता रूजू झाले आहेत.
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने विविध संवैधानिक अधिका-यांची नियुक्ती मार्चमध्ये केली. विद्यापीठातील सात संवैधानिक अधिकारी पदांसाठी ७, १३ व १४ मार्च रोजी मुलाखती घेण्यात आल्या. विद्यापीठ प्रशासनाने सदर प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरितीने पार पाडली. यानंतर डॉ.जयश्री राजेश सूर्यवंशी यांनी १७ मार्च रोजी कुलसचिवपदाची सुत्रे घेतली. तर याच महिन्यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा - डॉ.भालचंद बाबुराव वायकर, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्र शाखा - डॉ.प्रशांत शामराव अमृतकर, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखा - डॉ.वाल्मिक कचरु सरवदे यांनी अधिष्ठातापदाचा पदभार स्विकारला. तर तर उर्वरित अधिकाऱ्यांना 'लॉक डाऊन'मुळे रुजू होण्यास विलंब लागला.आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ.चेतना प्रल्हाद सोनकांबळे यांनी गेल्या आठवड्यात पदभार घेतला आहे.
सहा वर्षांनी मिळाला पूर्णवेळ परीक्षा संचालक
...............................
परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकपदाची सुत्रे डॉ.योगेश नारायण पाटील यांनी डॉ गणेश मंझा यांच्याकडून सोमवारी (दि.१५ ) घेतली. लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील कामकाजाचा मोठा अनुभव डॉ. पाटील यांच्या पाठीशी आहे. सहाय्यक संचालक, परीक्षा मंडळ संचालक , आयसीटी विभागप्रमुख आदी विविध पदांवर त्यांनी उत्तम रितीने काम केले आहे. ऑनलाइन परीक्षेसंदर्भात नेमलेल्या अग्रवाल समितीतही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जून २०१४ नंतर पहिल्यांदाच परीक्षा विभागाला पूर्णवेळ संचालक लाभला आहे. लोणेरे येथे काम करत असताना परीक्षा विभागाला अनेक राज्य राष्ट्रीय स्तरावरील परितोषिके, पुरस्कार त्यांनी मिळवून दिले आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते संशोधन, अध्यापन व प्रशासनात कार्यरत आहेत. संगणक अभियंता असलेल्या डॉ पाटील यांचा 'ब्लॉकचेन तंत्रज्ञान' हा पीएचडीसाठीच्या संशोधनाचा विषय आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसर संचालकपदाची सुत्रे डॉ.दत्तात्रय कृष्णा गायकवाड यांनी नुकतीच स्विकारली आहेत. शिवाजी विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागात ते कार्यरत होते. लॉकडाऊन संपल्यानंतर १२ जून रोजी ते रुजू झाले. डॉ प्रशांत दीक्षित यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे वरिष्ठ सदस्य संजय निंबाळकर, प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख, अधिसभा सदस्य प्रा संभाजी भोसले यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठाच्या उपपरिसर स्थापनेनंतर (२००४ ) पहिल्यांदाच पुर्णवेळ संचालकांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त संवैधानिक अधिकाऱ्यांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉ प्रवीण वक्ते व कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी अभिनंदन केले आहे.