काटी : उमाजी गायकवाड
वर्तमानाच्या धाकधुकीत, स्पर्धेच्या युगात बाहेरच्या जगाची बरोबरी करताना स्वतःची जबाबदारी पार पाडताना मागे राहून गेलेला आयुष्यातला आपला सुवर्णकाळ म्हणजेच काटी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील आपले शालेय जीवन आपण सहजच विसरून गेलो. शाळेचा पहिला दिवस, शाळेतल्या गमती जमती, शाळेतील मित्र, शिक्षक, बाकावर कोरलेली नावे, मधल्या सुट्टीत मित्रांसोबत एकत्र खाल्लेला डब्बा, एकमेकांच्या काढलेल्या खोड्या, शाळेतला शेवटचा दिवस हे सर्व विस्मरणात जातात. शाळेचे दिवस सरले तरीही त्या आठवणी मात्र मनाच्या कोपऱ्यात अजूनही घर करून आहेत. तो शाळेतला सुवर्णकाळ "किती छान होते ना ते दिवस? व्वा खरेच तोड नाही मित्रांनो त्या दिवसांना...
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात 35 वर्षांनंतर व्हाट्सअप क्लासमेंट 1985 या ग्रुपच्या माध्यमातून या ना त्या मार्गाने आपण सर्व वर्गमित्र एकत्र आलो. शाळेतल्या बाकावरील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, एकमेकांची भेट झाली, कोण काय करतो, मुलं काय करतात, एकमेकांच्या कुटुंबाची माहिती मिळाली, तब्बल 35 वर्ष उलटल्यानंतर आपले शालेय जीवनातील मित्र, मैत्रिणी कसे दिसत असतील, कोठे असतील असे अनेक प्रश्न मनात होते. एकमेकांचे फोटो पाहून 35 वर्षांनंतर आपल्यात झालेला बदल पाहून आश्चर्यही वाटले. क्लासमेंट ग्रुपच्या माध्यमातून दररोज होणारी चर्चा, एकमेकांची केलेली चौकशी व आपले शालेय जीवनातील मित्रपरिवार आनंदात असल्याचे पाहून मला व्हाटस्अप गृप काढल्याचे समाधान लाभत आहे.
- उमाजी गायकवाड (पत्रकार)
काटी, ता. तुळजापूर

