तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

जगासह देशामध्ये कोरोना विषाणुने थैमान घातले असुन सर्वच धार्मिक उत्सवावर पाणी फेरले असुन यामुळे आषाढी एकादशीच्या भक्तीमय सोहळ्याचा आनंदही या कोरोनाने हिरावुन घेतला असल्याने या कोरोना महामारीच्या संकटातुन जनतेला लवकर मुक्ती मिळावी अशी प्रार्थना विठुचरणी वारकरी,लहान थोर करीत आहेत.

     आज कोरोना या जिवघेण्या विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.या विषाणुमुळे सर्व धर्मियांच्या सण,उत्सव,यात्रा,उरूस अशा उत्सवावर संक्रात आली आहे.आज वारकर्यांसाठी पर्वणीच असणारी आषाढी एकादशी वर्षभर या दिवसाची आतुरतेने वाट पहात खांद्यावर भगवी पताका,गळ्यामध्ये टाळ,आणी मुखामध्ये विठुनामाचा जप करत उन,पाऊस ची तमा न बाळगता भक्तीमय वातारणात मैलोन मैल पायी चालत या दिवशी चंद्रभागेत डुबकी मारून विठुचरणी नतमस्तक होण्याचा आनंद घेणार्या वारकर्यांना मात्र कोरोनामुळे आजच्या आषाढी वारीस मुकावे लागत आहे.वारीमध्ये डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन भक्तीमय वातावरणात चालण्याचा तसेच डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन वारकर्यांची तहान भागवण्याचे पुण्य कर्मही करण्याचा आनंद  माझ्या माय माऊलींना मिळणार नाही. दरवर्षी नुकत्याच शाळा सुरू झालेल्या असणार व शाळेच्या सुरूवातीलाच आषाढी एकादशीनिमीत्त विठ्ठल- रुक्मिणीच्या वेशभुषेतील विद्यार्थी  व वारकरी वेशातील विद्यार्थी गावामधुन नगरप्रदिक्षणा घालताना ग्रामस्थांचे लक्ष वेधुन घेत व गावागावातील विठ्ठल- रुक्मिणी मंदीरामध्ये भक्तीसंगीतामध्ये तल्लीन होणारे चिमुकलेही या आनंदाला कोरोनामुळे मुकणार आहेत.शेतीची मशागतीची ,पेरणीची कामे करून विठुरायांच्या चरणी लीन होण्यासाठी आतुर असलेल्या शेतकरी राजालाही कोरोनामुळे पंढरीची वारी करता येणार नाही. सर्वांना घरी राहुनच मनातुन वारी करून विठुचरणी लीन व्हावे लागणार आहे व कोरोनाच्या या महामारीतुन सर्वांना मुक्त करण्यासाठी विठुचरणी प्रार्थना करावी लागणार आहे. अशा या आनंददायी भक्तीमय वातावरण निर्माण करून विठुरायांच्या दर्शनाची ओढ लावणार्या आषाढवारीचा आनंद यंदा कोरोनाने हिरावुन घेतला असल्याने सर्वांनाच या आनंदमयी,भक्तीमय वातारणाला  मुकावे लागत आहे.मात्र कोरोना महामारीमधुन लवकर मुक्ती मिळावी अशी प्रार्थना वारकरी विठ्ठल - रुक्मीणी  चरणी करत आहेत.
 
Top