तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असलेल्या शेतकरी राजाला यावर्षी निसर्गाने मृगाचा समाधानकारक पाऊस पाडून थोडासा दिलासा दिला अन् शेतकरी राजाने पेरणीला सुरूवात केली परंतु पेरलेले बियाणे खराब प्रतीचे असल्याने ते उगवलेच नाही त्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
कोरोना महामारीमध्ये हाताला काम नसल्याने अर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी राजाला यावर्षी मृग नक्षत्राचा पहीला पाऊस जोरदार बरसल्याने थोडा दिलासा मिळाला असुन शेतकरी राजाने उसनवारी,कर्ज घेऊन खरीपाच्या पेरणीला सुरूवात केली.परंतु शेतकरी म्हटले की संकट हे गणीतच झाले आहे. सुरूवातच महाबीज सोयाबीन बियाण्याच्या तुटवडयाने झाली कसेबसे बियाणे मिळवले व पावसाच्या भरवशावर पेरणी केलीही परंतु पेरलेले बियाणे हे खराब प्रतीचे असल्याने ते उगवलेच नाही.पुन्हा दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी राजा हैराण झाला मग सुरू झाली नुकसानभरपाईची उजळणी ,मिळु लागली कोरड्या आश्वासनाची खैरात या आश्वासनाची पुर्तता लवकर झाली नाही तर मात्र खरीप पेरणीचा हंगाम निघुन जाणार या विवंचेने शेतकरी राजा परेशान झाला आहे.झटपट पैसा देणारे सोयाबीन पिक असल्याने पुढील हंगामासाठी पैशाची तजवीज करण्यासाठी सोयाबीन पेरणीला शेतकरी प्राधान्य देतात.परंतु उत्कृष्ट दर्जाच्या कंपनीने निकृष दर्जाचे बियाणे विक्री करून शेतकर्यांची फसवणुक केली आहे.हजारो हेक्टरवरील पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकरी राजावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. कंपपनीमध्ये बियाणे भरताना व भरून बाहेर पडताना त्याची चाचणी केली जाऊन मगच बियाणे बाहेर विक्रीसाठी येत असेल तर मग बियाणे खराब कसे काय निघते?बियाणे बाहेर आल्यानंतर आपले खिसे गरम करण्यासाठी संगनमताने भेसळ करून शेतकर्यांना बियाण्याची विक्री तर केली जात नाही ना ? असे अनेक प्रश्न सामान्य शेतकर्यांना पडत आहेत. या भ्रष्टाचारामध्ये मात्र शेतकरीच शेतकरी राजाच चिरडला जात आहे. कृषी विभागाने याचे तात्काळ पंचनामे करून व्याजासह नुकसानभरपाई देऊन परतावा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे.