उस्मानाबाद,दि.2 :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 1 जुलै 2020 ते 15 जुलै 2020 या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यात वृक्ष लागवड पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. दिनांक 1 जुलै 2020 रोजी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद ते तुळजापुर या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा झाडांचे वृक्षारोपण करुन वनमहोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
त्यानुसार उस्मानाबाद ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा दिनांक 1 जुलै 2020 रोजी महसूल विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने 1587 रोपांचे वृक्षारोपण करुन वनमहोत्सव साजरा करण्यात आला.
तसेच उस्मानाबाद ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डाव्या बाजूला 391 व उजव्या बाजूला 887 असे एकूण 1278 वडांची झाडे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कावलदरा येथील जागेत 309 असे एकूण 1587 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी तहसील कार्यालय उस्मानाबाद, तहसील कार्यालय तुळजापूर, उपविभागीय अधिकारी कार्यालय उस्मानाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, वनविभाग उस्मानाबाद तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर आय आर बी कंपनी यांचे एकूण 350 अधिकारी-कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर , जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उस्मानाबाद, तहसीलदार तुळजापूर, विभागीय वन अधिकारी गायकर, सहाय्यक वनरक्षक बेडके ,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे विपाट, IRB चे गाडीकर व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम यांची उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त श्री.केंद्रेकर यांच्या हस्ते कावलदरा, भक्त निवास तुळजापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी श्री. केंद्रेकर यांनी कुष्ठधाम नजीक श्रमदानातून मागील वर्षी लावण्यात आलेल्या ठिकाणी तसेच त्याच परिसरात लावण्यात आलेल्या मियावाकी घनवन परिसराला भेट दिली.