उस्मानाबाद,दि.22 : जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोरोना सेंटर तयार करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात कोरोना सेंटर वरती संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी. तसेच दररोज सेंन्टर वर पिण्याचे पाणी, आंघोळीसाठी गरम पाणी, उत्कृष्ठ नाष्टा, पोटभर जेवण देण्यात यावे, सर्व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. सेंटरवर आलेल्या रुग्णांची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. याची सर्वस्वी जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांची राहील. जिल्ह्यातील कोणत्याही सेंटरवर अचानक भेटी दरम्यान सांगितलेल्या सूचनांचे पालन झाल्याचे आढळून न आल्यास संबंधित तहसीलदार, केंद्रप्रमुखास जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत दिल्या.

          शिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटरवरील विविध समस्याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्व संबंधित अधिकारी व केंद्रप्रमुख यांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष नंदू भैय्या राजेनिंबाळकर, तुळजापूर व उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी श्री. रामेश्वर रोडगे, कळंब व वाशीच्या उपविभागीय अधिकारी  सौ. अहिल्या गाठाळ, भूम व परंडाच्या उपविभागीय अधिकारी सौ. मनिषा राशिनकर, सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.
 
Top