उमरगा : रस्त्याच्या कामासाठी मुरुम काढलेल्या खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा दुर्देवी अंत झाला. ही घटना उमरगा तालुक्यातील कोळसूर कल्याणीच्या दयानंदनगर तांडाच्या शिवारात घडली. मृतांमध्ये दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे.
प्रतीक्षा मधुकर पवार (वय १२), ओंकार राजुदास पवार (वय १२) व अंजली संतोष राठोड (वय१३) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांचे नावे आहेत. उमरगा तालुक्यातील कोळसूरच्या दयानंदनगर तांड्यावरील वरील तीन मुले गुरूवारी दुपारी रस्त्याने फिरत गेली होती. यामधील किसन राठोड यांची भाची प्रतीक्षा मधुकर पवार ही लॉकडाऊन काळात पुणे येथून गावाकडे आली होती. हिच्यासह ओंकार व अंजली हे दोघे तुरोरी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षण घेत आहेत. हे तिनही मुले गुरुवारी दुपारी गावातील रस्त्याने फिरत गेले असता शिवारातील रस्त्याच्या कडेला राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरूम काढण्यासाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यामध्ये पडली. त्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक गजानन घाडगे, बीट अंमलदार वाल्मिक कोळी यांच्यासह पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस व ग्रामस्थांच्या सहकार्याने चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यावेळी नातेवाईकांचा आक्रोश सुरू झाला, ग्रामस्थांचे डोळे पाणावले. तीनही मुलांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान संतोष यमाला राठोड यांच्याकडून पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरु होते. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.