नळदुर्ग : प्रेरक लेखक दत्ता जोशी यांनी उमाकांत मिटकर यांच्या सामाजिक कार्यावर लिहिलेल्या ‘डिव्हाईन जस्टीस’या आत्मकथेचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंहजी कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले.

उमाकांत मिटकर हे भटके विमुक्त विकास परिषद यमगरवाडी येथील कामाचे महत्त्वाचे कार्यकर्ते,एका सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण या न्यायपिठावर काम करण्यापर्यंत येतो.

'डिव्हाईन जस्टीस' या पुस्तकातून उमाकांत मिटकर यांचा जीवनपट समोर येत असला तरी सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या असंख्य हाडाच्या कार्यकर्त्यांचे प्रातिनिधिक मनोगत या निमित्ताने समाजासमोर आलेले आहे आणि सदरील आत्मकथा संग्राह्य ठेवण्यासारखी व प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार राज्यपाल श्री भगतसिंहजी कोश्यारी यांनी काढले. 

पुस्तकाचे लेखक श्री.दत्ता जोशी हे महाराष्ट्रातील सकारात्मकतेवर लिहिणारे प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांच्या पुस्तक लिखाणातील 'डिव्हाईन जस्टीस' हे पस्तीसावे पुस्तक आहे. ज्ञानप्रबोधिनी केंद्राच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या,विचारवंत डॉ.स्वर्णलता भिशीकर यांनी सदरील पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.

दि. 25 मार्च 2020 ला सदरील पुस्तकाचे प्रकाशन होणार होते, पण कोरोनामुळे  ते लांबणीवर पडले तरीही प्रकाशन संस्थेने सदरील पुस्तक बाजारपेठेत उपलब्ध करून दिले होते.वाचकांच्या प्रतिसादामुळे लवकरच दुसरी आवृत्ती येईल असे 'द कॅटालिस्ट' या पुस्तक प्रकाशनाने सांगितले.

मुंबईत राजभवन  येथे झालेल्या कार्यक्रमात मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती श्री.रवींद्र संघवी, तुलसीयानी ग्रुपचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री.मनीष रूपानी, नाना पालकर  ट्रस्टचे कृष्णा महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top