उस्मानाबाद, दि. 24 : राज्याचे मंत्री एक बोलतात तर जिल्ह्याचे सत्ताधारी खासदार आमदार वेगळे बोलतात. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये मोठा संभ्रम व शासनाप्रती रोष निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या या विषयावर परस्पर विरोधी वक्तव्य विद्यार्थ्यांमध्ये चीड निर्माण करणारी असून  शासनाने आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करावे अशी आग्रही मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने  उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करण्यात आली आहे. 

गुरुवार दि. 24 रोजी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे हे उस्मानाबादेत आले असता भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी यांच्यावतीने  उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षापासून जिल्हावासीय सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. विद्यापीठ उपकेंद्र मंजूर करून घेतल्यानंतर तत्कालीन राज्यमंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी भविष्यात स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी एमआयडीसी ची ६० एकर जागा खास बाब म्हणून उपकेंद्रासाठी उपलब्ध करून घेतली होती. दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक होवून त्यामध्ये उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करणे बाबत माजी कुलगुरू आर.एन.माळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केल्याचे जिल्ह्याचे खासदार व उस्मानाबादचे आमदार यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले होते.

परंतु योगायोगाने बरोबर एक महिन्यांनातर दि. १९ सप्टेंबर २०२० रोजी ना. उदय सामंत यांच्या औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये त्यांनी विद्यापीठाचे विभाजन नाही, उस्मानाबाद उपकेंद्र विकासासाठी स्थापन केलेली समिती विभाजनासाठी नाही, विद्यापीठाचे दोन भाग करण्याचा कुठलाही प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून होणार नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मोठ्या कष्टाने निर्माण झाले असून उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ करण्याचा प्रश्नच नाही असे त्यांनी स्पष्टपणे दिलेल्या निवेदनात भाजपाने नमूद केले आहे. 

राज्याचे मंत्री एक बोलतात तर जिल्ह्याचे सत्ताधारी खासदार आमदार वेगळे बोलतात. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये मोठा संभ्रम व शासनाप्रती रोष निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या या विषयावर परस्पर विरोधी वक्तव्य विद्यार्थ्यां मध्ये चीड निर्माण करणारी असून  शासनाने आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करावे अशी आग्रही मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजसिंहा  राजेनिंबाळकर, जिल्हा चिटणीस गणेश इंगळगी, युवती जिल्हा सरचिटनीस पूजा राठोड, वि. आ. जिल्हा उपाध्यक्ष ओंकार वायकर, वि. आ. ता. अध्यक्ष भगवंत गुंड, अजय सपकाळ, ऋषिकेश शिंदे, अक्षय विंचुरे, ऋषिकेश कुलकर्णी, ज्ञांनेश्वर पडवळ, निरंजन जगदाळे, सारिका शिंदे, पूजा गुंडरे, ज्योति भुसारे आदीजण उपस्थित होते.


 
Top