उस्मानाबाद, दि. १० : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता शाळा व महाविद्याले तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने आज गुरुवार दि. 10 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
संसर्गजन्य कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पाच महिन्यापासून संपूर्ण देश लॉकडाऊन होता. सध्याला अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली असून दि. 1 सप्टेंबर पासून ब-यापैकी मुभा भारतीय जनतेला सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत. शासकीय, खासगी स्तरावरील अनेक सेवा, उद्योग व्यवसाय सध्याला सुरू आहेत. विविध कारखाने, उद्योग, बाजार, बससेवा, रेल्वेसेवा, दुकाने, हॉटेल्स, देशी दारू, बियर शॉपी, बियर बार, तसेच कांहीं निर्बंधासह सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मुभा देण्यात आलेली आहे.
मात्र शाळा, विद्यालय, महाविद्यालय बंदच आहेत. यामुळे देशाचे उद्याचे भविष्य असलेली आपल्या पुढच्या पिढीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जरी हे निर्बंध विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य वाटत असले तरी आजच्या चालू अनलॉक प्रक्रियेतून कोरोना च्या होणाऱ्या प्रादुर्भावामुळे सर्वच जनता विद्यार्थ्यांसहित मुक्तपणे संचार करत आहेत. यात सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर, कांहीं आरोग्यविषयक निर्बंध लावून शाळा, कॉलेज,विद्यालय, महाविद्यालय सुरू करावेत. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान न करता आरोग्यविषयक बाबींची पूर्तता करून शाळा, कॉलेज, विद्यालय, महाविद्यालय हे सुरू करण्यासाठी परवानगी द्या, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेना उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने दि. १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक अंतर पाळत, मास्कचा वापर करत निदर्शने करण्यात करण्यात आली .
यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे, राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव गायकवाड, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सारिका कांबळे, जिल्हा कोअर कमिटी अध्यक्ष बालाजी भाऊ गायकवाड, जिल्हाउपाध्यक्ष संभाजी कांबळे, जिल्हा सचिव संतोष मोरे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष मुकेश देडे, तालुका सचिव संतोष गायकवाड, कळंब तालुका उपाध्यक्ष सुदेश शिंदे, कैलास कांबळे, अजय कांबळे आदी समाज बांधव उपस्थित होते.