चिवरी : राजगुरु साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे दि. 14 रोजी मुसळधार पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास पाण्यात जाऊन शेतकरी बांधवांची अतोनात नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीचे प्रशासनाच्यावतीने दि. 17 पासून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.
यंदा मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग करून पेरणी केली परंतु, बोगस बियाणी निघाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले, त्यानंतरच्या काळात पीक चांगलें फळधारणेच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिली त्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यातच कशीबशी उत्पादन हाती येईल या आशेने शेतकऱ्यांनी पिकांची काढणीला सुरुवात केली. परंतु सलग चार दिवस मुसळधार पावसामुळे सर्व पिकाचे होत्याचे नव्हते झाले.
या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले त्या आदेशानुसार चिवरी शिवारात कृषी सहाय्यक पवार आर.एम, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, तलाठी डी.एन गायकवाड यांच्या उपस्थितीत पिकांचे पंचनामे सुरु करण्यात आली आहे.