मुंबई : बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा दिर्घ आजाराने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संत रामराव महाराज हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानचे प्रमुख होते.
बंजारा समाजाचे रामराव महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935 रोजी पोहरादेवी येथे झाला. रामराव महाराज यांना पोहरादेवी जि. वाशिम येथील संत सेवालाल महाराज यांच्या गादीवर वयाच्या 14 व्या वर्षी बसविण्यात आले. त्यांनी सन 1948 मध्ये अन्नत्याग केला होता. त्यानंतर ते फक्त कडूनिंब, दूध आणि फळांचे सेवन करत होते.
गेल्या काही महिन्यांपासून दूध घेतानाही त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे ते फक्त कडूनिंब आणि ज्यूस घेत होते. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना 17 ऑक्टोबरला उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे देशभरातील बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे. दरम्यान आज सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी त्यांचे वाशिम जिल्ह्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.