उस्मानाबाद, दि. 17 : मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये धीर धरावा राज्य शासन अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत देण्यात येईल असे ग्वाही सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, पर्यावरण, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी राज्यमंत्री बनसोडे करत होते.त्या प्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
यावेळी तहसीलदार गणेश माळी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी उमेश घाटगे, गट विकास अधिकारी श्रीमती दिवाने, भागवत भंडारकर , जगदीश पाटील, जिवन चव्हाण, नंदकुमार क्षीरसागर,शरद चव्हाण, यांच्यासह सर्व संबंधित तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील शेतकरी गौतम सदाशिव चव्हाण यांच्या शेतीची व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन केली. शेतकरी चव्हाण यांच्या शेताचे नाल्याच्या प्रवाहामुळे शेती मधील जमिनीचा थर वाहून गेल्याचे दिसून आले तसेच ठिबक सिंचन सेट तसेच टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने उस्मानाबाद तालुक्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.