नळदुर्ग, दि. 19 : गेल्या आठवड्यात नळदुर्ग व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. घरांची पडझड झाली. तर बोरी नदीला पुर आल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. त्याचबरोबर शासनाकडून युनिटी कंपनीने संगोपनार्थ घेवुन सुशोभिकरण केलेल्या भुईकोट किल्ल्याचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 50 लाखांचे युनिटीचे नुकसान झाले आहे. 

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला पुरातत्व विभागाकडून युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने जतन व संगोपनार्थ काही वर्षापूर्वी घेऊन किल्ल्याचे रुपडे बदलले. किल्ल्यात पर्यटकांसाठी रस्ते, पिण्याचे पाणी, ठिकठिकाणी शोभेचे  व फुलझाडे, बगीचा, कारंजे आदीसह विविध विकासात्मक कामे केल्याने हा किल्ला पर्यटकाना खुणावत असल्याने देश-विदेशातील पर्यटकानी मोठयाप्रमाणावर या किल्ल्यास भेटी दिल्या आहेत. 

बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पाऊस झाल्याने बोरी धरणाचे सांडवे ओसंडून वाहिल्याने शहराच्या उत्तरेकडून वाहणारी बोरी नदीने रौद्ररुप धारण केल्याचे दिसून आले. शहरातील काही घरामध्ये पाणी शिरले. तर किल्ल्यातील पाणी-महालावरुन मोठयाप्रमाणावर अतिवेगाने पुराचे पाणी वाहुन गेले. पाणीमहालावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या दुतर्फा लोखंडी रेलिंग पुराच्या पाण्याने वाहुन गेले. तसेच पाणीमहालाच्या खाली दोन मोठे नवीन 10 लाख लीटर क्षमतेचा बंधारा, पाणीमहालाच्या खाली पात्रालगत तयार केलेले रस्ते, आंब्यांची झाडे, सहा विद्युत मोटारी पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले. तर किल्ल्याच्या बाहेर असलेल्या रिसॉर्टचेही मोठे नुकसान झाले आहे.  पुरामुळे पाणीमहालावरील लोखंडी कठडे, रस्ते, विद्युत पंप, फळझाडे वाहुन गेली असून तब्बल 50 लाख रुपयाचे युनिटी कंपनीचे नुकसान झाल्याची माहिती युनिटीचे संचालक कफील मौलवी, जयधवल करमरकर, श्रीमती वैशाली जैन यांनी बोलताना दिली आहे. 

दरम्यान, यंदाच्या वर्षी पावसाने सरासरी ओलांडुन सोमवार दि. 19 ऑक्टोबर अखेरपर्यंत 949 मिलीमिटर पाऊस झाले. तर ऑक्टोबर महिन्यात आजअखेरपर्यंत 3‍00 मि.मी. पाऊस झाले आहे. 

 
Top