तुळजापुर : कुमार नाईकवाडी
परतीच्या पावसाने तुळजापुर तालुक्यातील आपसिंगा गावातील तळे ओव्हरफ्लो होऊन नदीला मोठा महापुर आल्यामुळे शेतातील पिकांचे व विहीरीचे मोठे नुकसान झाले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार दि. २० रोजी आपसिंगा येथे भेट देवून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी फडणवीस यांनी शेतक-यांशी संवाद साधुन त्यांना धीर दिला.
आपसिंगा ता. तुळजापुर गावातील शेतकरी दत्ता गुलाब रणदिवे, एकनाथ गुलाब रणदिवे, विश्वनाथ गोरे, शंकर जमदाडे, वैजिनाथ कोल्हे, नितीन बचुटे यांच्या शेतातील पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. यामध्ये कांदा, सोयाबीन, द्राक्ष बाग व विहीरीचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फडणवीस यांनी नुकसान झालेल्या शेतातील पिकाची पहाणी केली. या वेळी शेतकरी बांधवांनी फडणवीस यांच्यासमोर हंबरडा फोडला. "साहेब आमच्या शेतीचे अतिवृष्टी मुळे मोठे नुकसान झाले, आम्हाला मदत करा" याची याचना केली. या शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस यानी धीर दिला. राज्य सरकार कडुन लवकरात लवकर मदत करुन देऊ, असे आश्वासन दिले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून फडणवीस यांनी पचंनामा झालेल्याची निवेदने स्विकारली.
यावेळी तुळजापुर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, आ. संभाजी पाटील निलंगेकर, तहसिलदार सौदागर तांदळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, विजय दंडनाईक, आपसिंगा गावचे सरपंच राजु गोरे, विकास मलबा, मिडीया जिल्हाउपाध्यक्ष संजय खुरुद, मिडीया तालुका अध्यक्ष सचिन ताकमोघे आदीसह भा.ज.पा.चे कार्यकर्ते, आपसिंगा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.