तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे दि. १४ रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी राजाचा हातातोंडाशी आलेला घास पाण्यात जाऊन शेतकरी बांधवाचे अतोनात नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीचे प्रशासनाच्या वतीने दि. १७ पासून पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मृग नक्षत्राचा पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकरी बांधवानी पेरणीची लगबग केली. परंतु पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकरी राजावर दुबार पेरणीचे संकटं उभे राहिले. बियाणे नुकसानभरपाई काही मिळाली नाही. पण जगाचा पोशिंदा उसनवारी, कर्जे काढून पुन्हा जोमाने पेरणी केली. निसर्गानेही चांगली साथ दिल्याने सोयाबीन, उडीद, कांदे व इतर पिके जोमाने येणार या आशेने शेतकरीराजा खुश झाला. सोयाबीन, उडीद व इतर पिके काढणीसाठी तयार झाली असतानाच दि. १४ रोजी निसर्गाने रौद्ररुप धारण केले.
सलग दीड दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने होण्याचे नव्हते केले. कर्ज काढून चार महिने पोटच्या पोरावानी जोपासलेले पिक एकाच क्षणात नाहीसे झाले. या मुसळधार पावसाने अनेकांनी काढुन ठेवलेले सोयाबीन ताडपत्री सहीत वाहुन गेले तर नुकतेच लागण केलले कांदेही वाहुन गेले. अनेक शेतकरी बांधवाचे वर्षेभर जोपासलेले ऊसाचे पिक आडवे झाले. काहींचे पत्र्याचे शेड, जनावरांचा चारा(कडबा) वाहुन गेला. घरांनी पाणी घुसले, काहींच्या घरांची पडझड झाली. तर या पावसाने अनेकांच्या जमीनीतील काळी माती धुवून जाऊन फक्त मुरूम शिल्लक राहीला. आतापर्यंत केलेले सर्वच एका क्षणात पाण्यात गेल्याने शेतकर्यांचे कधी न भरून निघणारे नुकसान झाले.
या झालेल्या नुकसाची खासदार,आमदार यानी प्रत्यक्ष पहाणी करून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने तामलवाडी शिवारात गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष पहाणी करून पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकर्यांनी जीयो टॅग फोटो काढून तलाठी कार्यालय येथे जमा करावे असे आवाहनही तलाठी श्रीमती राजमाने व ग्रामविकास अधिकारी पी. एन.लाटकर यांनी शेतकरी बांधवाना केले आहे.