तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

नवरात्र उत्सवानिमित्त गावोगावी भवानी मातेच्या मुर्तीची स्थापना करताना आई भवानीच्या दरबारातुन तुळजापूर येथुन भवानी ज्योत नेऊनच भवानी मातेच्या मुर्तीची स्थापना करण्यात येते. परंतु कोरोना महामारी मुळे दरवर्षी भवानी ज्योतने गजबजलेले रस्ते आजमात्र सुने सुने दिसून आले. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवाला दि.१७ घटस्थापनेपासुन सुरूवात झाली. घटस्थापनेच्या आदल्या दिवसापासून उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील देवी भक्त आपापली वाहने घेऊन भवानी ज्योत घेऊन जाणेसाठी आई भवानीच्या दरबारात एकच गर्दी करतात. परंतु कोरोनाच्या भयानक संकटाचा सर्वजण सामना करीत आहेत. या संकटामुळे या नवरात्रोत्सवाच्या कालावधीमध्ये भक्तांनी तुळजापूर येथे न येण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत.

यावर्षी सर्वच उत्सव साधेपणाने साजरे झाले असून नवरात्रोत्सव ही साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याने दरवर्षी आपापली वाहने घेऊन भवानी ज्योत घेऊन जाणेसाठी वाजतगाजत येणारे देविभक्त यावर्षी मात्र दिसले नाहीत. रात्रभरपासुन हजारो किलोमीटर पायी भवानी ज्योत घेऊन प्रवास करणार्या भाविकांविना यावर्षी रस्ते सुने सुने दिसून येते होते.

 
Top