जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी (नळ) येथे एका युवा शेतकऱ्याने सतत तीन वर्षाच्या नापिकीला कंटाळून व उसनवारी कर्जाला कंटाळून स्वतःच्या राहत्या घरातील खोलीत लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना दि. २९ (गुरुवार) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतच्या अधिक माहिती अशी की, जळकोटवाडी( नळ) येथील शिवाजी राम कदम हा शेतकरी त्यांचे वडील राम मारुती कदम यांच्या नावे जळकोट शिवारात गट नं ४२९ व ४३६ मध्ये एकूण १ टहेक्टर ४३ आर एवढी शेतजमीन आहे. वडिलांच्या नावे असलेली शेती शिवाजी कदम हा पाहत होता. शेतीमध्ये गेल्या तीन वर्षापासून सतत नापिकी होत आल्याने व ऊसनवारी कर्जाचा बोजा वाढत चालल्याने शिवाजी हा चिंताग्रस्त होता. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे कोणतेही पीक हाती लागले नाही. उत्पन्न नाही कर्ज फेडायचे कसे या चिंतेत शिवाजी कदम राहत होता. सतत नापिकी व कर्जाला कंटाळून शिवाजी राम कदम(वय-४२) या युवा शेतकऱ्यांने गुरुवार(दि.२९) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरातील खोलीत लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. जळकोट व जळकोट वाडीत एकाच दिवशी दोन शेतकरी आत्महत्या झाल्याने खळबळ माजली असून शेतकरी आत्महत्या वर ठोस उपाययोजना व्हाव्यात. अशी मागणी आता पुढे येत आहे.
या घटनेचा जळकोट सज्जाचे तलाठी तात्यासाहेब रुपनवर यांनी केला. कृषी विभागाचे कृषी सहायक जी. एस. कांबळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. शिवाजी कदम या युवा शेतकऱ्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी,२ मुले,१ भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे.