चिवरी : राजगुरु साखरे
ग्रामीण व शहरी दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी महामंडळाची लाल परी सर्वात मोठा पर्याय आहे. बस नसेल तर यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काय हाल होतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्या कोरोना संकटात दिसून येते. केवळ बस नसल्याने लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिक घरातूनच बाहेर पडत नाहीत. परंतु खासगी वाहनाने प्रवास केला तर आर्थिक भुर्दंड आणि अधिक प्रवासी घेऊन जात असल्याने पुन्हा कोरोनाचा धोका आला. म्हणून ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटी बसची प्रतीक्षा लागून राहिली आहे. परंतु महामंडळाकडून सध्यातरी अनास्था दिसून येत आहे.
सध्या तुळजापूर तालुक्यात ग्रामीण भागात केवळ मोजक्याच बस सुरू आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही सुरू झाली नसल्यामुळे नागरिकांना दवाखाना, बाजार व विविध कामासाठी तालुक्याला व बाजारपेठेच्या ठिकाणी जाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत. सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.