जळकोट, दि. ८ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी व उमरगा तालुक्यातील तलमोड येथील टोलनाक्यांवर नियमबाह्य टोल वसुली सुरू असून वाहनधारकांची लूट केली जात आहे .या टोल वे वरील सर्वच कामे ही अत्यंत निकृष्ठ व अर्धवट स्थितीत आहेत. परिणामतः रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरीकांचा नाहक बळी जात आहे. या महामार्गावरील सर्व कामे पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करण्यात येऊ नये तसेच सदर दोन्ही टोलनाक्यांवरील वाहनधारकांची आर्थिक लूट थांबवावी व हे नियमबाह्य चालू केलेले टोलनाके तात्काळ बंद करावेत व या संपूर्ण गैरप्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती.
नवगिरे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांकडून खुलासा मागविला आहे. तर पोलीस उपअधीक्षक तुळजापूर यांनी सदर टोलनाक्यांच्या अधिका-यास उद्या दि. ९.११.२० रोजी चौकशीसाठी नोटीस जारी केली आहे.
तक्रारदार मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सदर महामार्गावरील सर्व उड्डाणपूलांची कामे पूर्ण करावीत, संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करून खड्डेमुक्त करावा, सर्वच ठिकाणचे सर्व्हिस रोड व व्हिलेज रोड हि कामे पूर्ण करावीत मगच टोलनाके सुरू करावेत .वाहनधारकांना ज्या सुविधा व सेवाच मिळत नाहीत,त्याचा पैसा वाहनधारकांनी का भरायचा ? असा प्रश्न करून त्यांनी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाकडे योग्य पाठपुरावा करून प्रसंगी न्यायालयात जाऊन टोलनाक्यांच्या माध्यमातून कांही लोकप्रतिनिधी, राजकिय पक्षांचे नेते व प्रशासनातील कांही अधिकार्यांना हाताशी धरून चालू असलेली ही लूट थांबविण्यासाठी सदर दोन्ही टोलनाके बंद करण्यासाठी प्रयत्न करित असल्याचे सांगितले.