उस्मानाबाद, दि. 22 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमरगा, भुम,परंडा येथील प्रेरिकांचे कोविड नियमांचे पालन करून पाच दिवसीय मूलभूत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात एकूण 75 प्रेरिका सहभागी झाल्या होत्या.
या प्रेरिकांशी समारोप प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड यांनी आज येथे संवाद साधला प्रशिक्षणादरम्यान स्वयंसहाय्यता समूहांची स्थापना,महिला,सक्षमीकरण, गटांचे लेखे अद्ययावत करणे, दशसुत्रीचे पालन, नेतृत्व विकास आदी विषयांवर प्रज्ञा मगर, पुष्पा आवाड, शकुंतला बनसुडे, शुभांगी शिंदे या प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा प्रभारी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नितीन दाताळ यांची उपस्थिती होती.
प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना डॉ. विजयकुमार फड यांनी प्रेरिकांनी उमेद अंतर्गत दैनंदिन कामाबरोबरच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गावात पोहचविणे, जनजागृती करणे, गावातील समस्या, उदा. गावातील स्वच्छता, अंगणवाडी,शाळा, दवाखाने इ.संदर्भातील अडचणी संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देणे, अशी कामे करावीत असे सांगितले. त्याबरोबरच महिलांनी गावात काम करताना स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी आहोत अशा भावनेतून काम करावे, असे सांगितले.
गावातील अडचणी सोडवण्यासाठी सर्वांशी समन्वय ठेवावा, जागरूक राहुन, गावातील अडचणी सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा, गावात एकतेची,सामाजिक जबाबदारीची जाणीव प्रत्येकात तयार होईल अशा पद्धतीने काम करावे असे मत डॉ. फड यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी प्रशिक्षणार्थीनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हा अभियान व्यवस्थापक समाधान जोगदंड, लेखाधिकारी अप्पासाहेब पवार, जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे, गोरक्षनाथ भांगे, आदी.उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्ताफ जिकरे यांनी तर आभार समाधान जोगदंड यांनी मानले.