उस्मानाबाद, दि. 17  : कोरोना महामारीच्या संकटात जिल्ह्यातील पोलीस पाटील यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मोलाचे काम केले आहे, पोलिसांच्या पुढे जाऊन त्यांनी योगदान दिले आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी केले.

उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीने पोलीस पाटील दिनाचे औचित्य साधून दि\ 17 डिसेंबर रोजी पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचा कोरोना महामारीत उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राजतिलक रोशन हे बोलत होते. यावेळी प्रोबेशनरी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावळे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय बाबर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संदीप पालवे म्हणाले की, कोरोनाची लढाई अजून संपलेली नाही, त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे, पुणे, मुंबई सारख्या शहरातून आलेल्या लोकांना विलगिकरण करताना पोलीस पाटील यांनी मोठी जबाबदारी पार पाडली आहे, ग्रामपंचायत निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता घ्यावी,असे आवाहन केले.

यावेळी गाव कामगार पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, सचिव धनंजय गुंड, मराठवाडा कार्याध्यक्ष राहुल वाकुरे, दिनकर पाटील, महेशंकर पाटील, प्रमोद माळी, परेश शिंदे, अश्विनी वाले, सुकुमार फेरे, श्रुतिका हाजगुडे, स्वाती गवाड, मनीषा घेवारे, सुनीता जगदे, अमृता माळी आदी उपस्थित होते.

 
Top