मुंबई, दि. 11 : राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज शुक्रवार दि. 11 रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सर्व ठिकाणी दि. १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून दि. २३ डिसेंबर 2020 पासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
असा असेल निवडणूक कार्यक्रम :-
15 डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील
23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी
31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी
4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी
15 जानेवारी मतदान
18 जानेवारी मतमोजणी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणुका झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. १४ हजारांवर ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी निवडणुका होत असल्याने गावागावांतील राजकारण चांगलेच तापणार आहे.