अणदुर, दि. 11 : "आमचा नेता लई पावर फुल,साऱ्या पटल माघन न हटल पाऊल पुढे टाकल बघुन त्यांची कामाची ख्याती आभाळ ही झुकल, हाताना साथ हाताची डोळ्यांना आस उद्यांची, वाजवुन टाकणार गाजवुन टाकणार, झाली तयारी, संकल्प बोलके हाम तो निकल पढे गगन कहे विजयी भव" आदी गाण्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारार्थ सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. प्रत्यक्ष मतदारा पर्यंत पोहचणे शक्य होत नसल्याने सोशल मिडीयाचा आधार उमेदवार घेत आहेत.तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील" ग्रामपंचायत निवडणूकीत 17 जागे साठी 51 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने चांगलीच रंगली आली आहे.
तुळजापूर तालुक्यातील सर्वात मोठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र स्थान असलेल्या अणदुर येथे माजी सभापती दिपक आलुरे, काशीनाथ शेटे, दिपक घोडके यांच्या नेतृत्व खाली भाजपा प्रणित जय मल्हार पॅल व रामचंद्र आलुरे, जि.प.सदस्य बाबुराव चव्हाण, युवानेते सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी यांच्यात काही प्रभागात तुल्यबळ लढत तर प्रभागात सरळ लढत होत आहे. अपक्ष उमेदवारांनी एकला चलो ची भुमिका घेत प्रचारात मुसांडी मारली आहे.
या निवडणुकीत तीन डाँक्टर महाविकास आघाडी कडुन निवडणूक लढवित आहे. डॉ. नागनाथ कुंभार, डॉ. जितेंद्र कानडे, डॉ. विवेक बिराजदार यांचा समावेश आहे. डॉक्टर ग्रामपंचायत निवडणूक लढवित असल्याने कोण मारणार बाजी? कोणाला देणार दवा? कोणाची काढणार हवा ? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक तीन मध्ये महाविकास आघाडी कडुन शिवसेना माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण घोडके, गोदावरी गुड्ड हे सख्ये भाऊ बहीण पहील्यांदा आपले नशीब आजमावित आहेत. तर प्रभाग क्रमांक एक मध्ये अपक्ष चार , प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन, प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक, चार मध्ये एक, पाच मध्ये चार, सहा मध्ये तीन या अपक्षांनी उमेदवारांनी निवडणूकत चांगलीच चुरस निर्माण केली आहे.
या निवडणुकीत आजी माजी सरपंच, पचायंत समिती सदस्यासह माणिक आलुरे, धनराज मुळे, रामचंद्र आलुरे, सरीता मोकाशे, साहेबराव घुगे या दिग्गजासह स्नेहा मुळे, उज्वला बंदपट्टे, राहुल राठोड, पद्जा जाधव, जयश्री व्हटकर, अनिता घुगरे, काशिनाथ घुगे हे नवखे उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. ही निवडणुक प्रतिष्ठेची झाल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही कडचे पँनल प्रमुख आपले उमेदवार कसे योग्य हे पटवुन देताना जंग जंग पछाडत आहे.
महाविकास आघाडी चे पँनल चे उमेदवार विकास कामावर मतदानाचा जोगवा मागत आहे. भाजपा प्रणित जय मल्हार पँनल पुढील विकास करण्याचा वचननामा यावर मताचा जोगवा मागत आहे. मतदार कोणाला देणार कल ? कोणाची हवा करणार गुल ? या कडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. अणदुर च्या आज पर्यंत च्या निवडणुकीत जातीय समीकरणाला मतदारांनी थारा दिला नाही. योग्य सक्षम उमेदवार निवडून दिले आहेत. एकंदरीत पाहता निवडणूक चुरसीची होणार असुन यात मतदार कोणाला कल देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.