रेडा, दि. १४ : संतोष भोसले सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे खोटारडे असून गेली वीस पंचवीस वर्ष ते खोट बोलत आहेत, असा आरोप मंत्री भरणे यांनी केला आहे.
भरणेवाडी (ता इंदापूर) येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. ” ज्यांना मोठा अनुभव आहे त्यांनी केंद्राचा निधी आणल्याचा दावा करतात. किती लबाड बोलायचं याला सीमा आहेत. तालुक्यातील माणूस किती खोटा असतो.लोकांना किती दिवसं खोटं सांगायचं, असा सवाल दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना केला आहे.
ओळख परेड का केली नाही?
दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन असणाऱ्या सरपंच, उपसरपंचाचा सत्कार केला.”तुमच्याकडे 38 सरपंच होते तर का ओळख परेड केली नाही. तालुक्याला गेली 20-25 वर्ष खोटं सांगायचं काम केले. तुम्हाला जनतेने विश्रांती घ्यायचा सल्ला दिलेला आहे. विश्रांती घ्या, निवडणुकीच्या काळात जनता ठरवेल, कुणाला मतदान करायचं, राष्ट्रवादीला की भाजपला जनतेला ठरवू द्या, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यात भाजपच्या 38 ग्रामपंचायती निवडून आल्याचा दावा केला होता.
सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न
इंदापूरच्या विकासासाठी 88 कोटींचा आराखडा तयार केला असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली. गावाच्या विकासासाठी कुणालाही निधी कमी पडू देणार नाही, असं भरणे म्हणाले.
मी जर फोटो काढला तर पेपरचं एक पान कमी पडेल
इंदापूर तालुक्यातील विकासकामांच्या उद्घाटनाच्या कामांचं फोटो काढायचं ठरवलं तर पेपरचं पान कमी पडलं, असा टोला दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना लगावला. मी एवढी काम करतो मात्र, त्याचा फोटो राहतो बाजूला, मी जर फोटो काढला तर एक पान भरेल इतके फोटो मिळतील. चार वर्ष उद्घाटनं केले तरी दिवस कमी पडतील, असं नियोजन आहे. किती खोटं बोलयाचं याला सीमा असते,असं वक्तव्य भरणे यांनी केला.
इंदापूरमधील 60 पैकी 38 गावांवर भाजपचा संरपच, हर्षवर्धन पाटलांचा दावा
इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये 60 पैकी 38 ग्रामपंचायतीवर भाजपचं वर्चस्व असल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला होता. यावररुन दत्तात्रय भरणे यांनी पाटील यांच्यावर निशाणा
साधला.