उस्मानाबाद दि.१४ :
वाढत चाललेल्या कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठीच प्रत्येकांनी दक्षता व काळजी घेणे महत्त्वाचे व अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे यांनी शुक्रवार दि.१४ मे रोजी केले.
उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथे राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्यावतीने ५० खाटांचे शरदचंद्र पवार ग्रामीण कोविड आयसोलेशन केअर सेंटरचे उद्घाटन नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटुरे, मंडळ अधिकारी व्ही.व्ही. काळे, सरपंच अमोल पाटील, ताकविकीचे सरपंच अहेमद पठाण, चंद्रकला निटुरे, अजिंक्य निटुरे, प्रतिक्षा निटुरे, सुरेश बामनकर, नंदू पवार, तलाठी जी.के. कोळी, आरोग्य कर्मचारी एस.एम. बोरेवाल, व्ही.टी. कस्पटे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अरुण निटुरे म्हणाले की, या केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी योग्य औषधोपचार मिळण्यासह सकस आहार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांनी कोरोना हा अंगावर आजार न काढता या सेंटरमध्ये दाखल होऊन औषधोपचार घेऊन स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
अशोक चव्हाण यांनी जसा आपण विचार करतो, त्याप्रमाणे आपले आयुष्य घडणार आहे. त्यामुळे तणावमुक्त राहण्याचा प्रत्येकांनी प्रयत्न केल्यास हा आजार लवकरात लवकर बरा होऊ शकतो असे सांगितले.
यावेळी केशेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका, आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
१८ गावातील नागरिकांची होणार सोय
केशेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १८ गावे येत असून या परिसरातील रुग्णांना या कोविड आयसोलेशन केअर सेंटरच्या माध्यमातून आरोग्य सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
१८ गावातील नागरिकांची होणार सोय
केशेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १८ गावे येत असून या परिसरातील रुग्णांना या कोविड आयसोलेशन केअर सेंटरच्या माध्यमातून आरोग्य सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.