मुरूम, दि . २९ :
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) यंदाच्या वर्षापासून सुरु केलेला ज्योतिष विषयावरील अभ्यासक्रम तातडीने रद्द करावा अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे केली आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते एक छद्म विज्ञान आहे. ग्रह-गोल-ताऱ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला ‘खगोलशास्त्र’ असे म्हणतात आणि खगोलशास्त्राच्या उपलब्ध अभ्यासानुसार ग्रह-गोल-ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचा दावा करणारा ज्योतीष अभ्यासक्रम तातडीने रद्द करणे आवश्यक आहे. या प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद केले आहे की, सन २००१ साली अटलबिहारी वाजपेयी सरकारने देखील अशा स्वरूपाचा निर्णय घेतला होता. त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यावर तो निर्णय मागे घेण्यात आला होता. डॉ.जयंत नारळीकर यांच्यापासून अनेक ज्येष्ठ खगोल वैज्ञानिकांनी याला विरोध केला होता. ज्येष्ठ वैज्ञानिक जेम्स रॅन्डी यांनी ज्योतिषांनी जगाच्या अंताच्याविषयी केलेल्या ५० दाव्यांचा अभ्यास करून त्यांचा फोलपण सिद्ध केला होता. तसेच भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते व्ही.वेन्कटरामन यांनी देखील ज्योतिषाची तुलना छद्मविज्ञानाशी केली आहे, याची देखील आठवण या निमित्ताने करून देण्यात आली आहे. इग्नूच्या या अभ्यासक्रमात चंद्रग्रहण, सूर्यग्रहण अशा खगोलशास्त्रीय घटनाच्या विषयी अज्ञान आणि भीती पसरवण्याचे काम केले जात आहे.
ग्रहणाच्या कालखंडात नीट आहार न घेतल्याने गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दोन वर्षांच्या पूर्वी घडली असताना अशा गैरसमजांना बळकटी देणाऱ्या अवैज्ञानिक गोष्टी या लोकांच्या जीवाशी खेळ आहेत, असे देखील या पत्रकात पुढे म्हटले आहे.
एकाच वेळी ज्योतिषाला विज्ञान म्हणायचे आणि त्यावर आधारित उपाय सुचवायचे आणि शिकवताना मात्र ते कला माध्यमात अभ्यासक्रम म्हणून घालायचे, हा देखील दिशाभूल करणारा प्रकार आहे. समाजातील ज्योतिषविषयक गैरसमज दूर करणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश व हेतू असताना, ज्या विद्यापीठाच्या माध्यमातून ज्ञान मोकळे केले गेले. त्या मुक्तविज्ञापीठाने असा अभ्यासक्रम सुरु करणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. मुहूर्ता सारख्या कोणत्याही वैज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टी आणि आपल्या कर्तृत्वापेक्षा ज्यांचा आपल्या वैयक्तिक कर्तृत्वाशी काहीही सबंध नाही. अशा गोष्टींच्यावर अवलंबून राहणारी मानसिकता यामधून निर्माण होते आणि ते समाजासाठी अत्यंत घातक आहे.
कोरोनाच्या साथीने विज्ञानवादी मानसिकता जोपासण्याचे महत्व अधोरेखित होत असताना अशा स्वरूपाच्या अशास्त्रीय गोष्टीना उत्तेजन देणे शासनाने टाळायला हवे. महाराष्ट्र शासनाने अशा स्वरूपाच्या अवैज्ञानिक गोष्टींची अंमलबजावणी बाबत निदान महाराष्ट्रापुरती स्थगिती द्यावी, अशी देखील मागणी महाराष्ट्र अंनिसचे राज्य सल्लागार समिती सदस्य अँड.देविदास वडगांवकर, राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा.किरण सगर, जिल्हा प्रतिनिधी प्रा.डॉ.महेश मोटे, बुवाबाजी संघर्ष विभागाचे सदस्य चंद्रकांत उळेकर आदींनी प्रसिद्धीपत्रकाच्याद्वारे केले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विद्यापीठाने हा अभ्यासक्रम तातडीने स्थगित करावा. यासाठी देशभरातील प्रमुख पंचवीस वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ञांच्या सह्यांचे निवेदन मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना देण्यात येणार असल्याचे देखील या निवेदनात नमूद केले आहे.