मुबंई ,दि.३ : 
पावसाचं केरळमध्ये आगमन झालं आहे. हवामान खात्याने एका ट्विटद्वारे याची माहिती दिली. खासगी हवामान संस्था असलेल्या स्कायमेटने 31 मे रोजीच हंगामी पावसाचे केरळमध्ये आगमन झाल्याचे जाहीर केले होते. हवामान खात्याने मात्र हंगामी पावसाचे आगमन हे दि. 3 जूनच्या आसपास होईल असं ठामपणे सांगितलं होतं.


सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण करणाऱ्या मान्सूनच्या आगमनावरून हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्यामध्ये चांगलीच जुंपली होत. स्कायमेटने मान्सून केरळमध्ये दाखल झाला असे जाहीर केले होते, मात्र हवामान खात्याने म्हटले होते की मान्सूनसाठी 3 जूनपर्यंत थांबावे लागेल. हवामान खात्याने 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज याआधी केला होता, मात्र तो त्यांनी बदलला होता.



स्कायमेटने देशात मान्सून 30 मे रोजीपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. सर्वसामान्य गतीने मान्सून केरळकडे सरकत असून अंदमान-निकोबार द्वीपसमूहामध्ये मॉन्सून 21 मे रोजी दाखल झाला होता. तिथून हंगामी पावसाने उत्तर-पश्चिम दिशेने वाटचाल सुरू केली आणि मान्सून 24 मे रोजी श्रीलंकेत दाखल झाला. पुढच्या तीन दिवसांत तो श्रीलंकेच्या उत्तरेकडे पोहचणार होता. 27 मे रोजी मान्सून मालदीवमध्ये दाखल झाला होता त्यावेळी मान्सून केरळपासून 200 किलोमीटर दूर होता. 'तौकते' आणि 'यास' चक्रीवादळानंतर देशाच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर 30 मेपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला होता.


हवामान खात्याने काय म्हटले होते
हवामान खात्याने 27 मे रोजी 31 मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असे म्हटले होते, मात्र सर्वसामान्यपणे देशात 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होतो. मात्र नंतर मान्सून 3 जूनपर्यंत देशात दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले होते. दरवर्षीप्रमाणे सामान्य मान्सून राहील असे सांगत जून ते सप्टेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या तांदूळ, मका तसेच इतर पिके नेहमीप्रमाणे घेऊ शकता, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
 
Top