लोहारा, दि . २४ :
 वटपौर्णिमेच्या निमित्ताने जिजाऊ ब्रिगेड तर्फे लोहारा ( जि. उस्मानाबाद ) येथे वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली. 

यामागे अशी संकल्पना होती की वडाची पूजा करण्यासाठी त्याच्या फांद्या तोडण्यापेक्षा,एकाच झाडाला दोरा गुंडाळून त्याला फेऱ्या मारण्यापेक्षा, सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी झाडाला वेदना देण्यापेक्षा,एका झाडाला जीवनदान देणे हे केव्हाही योग्य हा विचार मनात धरून आज वडाच्या झाडाची तहसील कार्यालय लोहारा तसेच सिविल हॉस्पिटल लोहारा या दोन ठिकाणी वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली. यामध्ये आणखी एक नावीन्यपूर्ण गोष्ट म्हणजे ज्या महिलेचा नवरा वारला त्या महिलेला आजच्या दिवशी हीन लेखलं जातं तिला प्रवाहातून बाजूला सारलं जातं पण त्या महिलेची यात काहीही चूक नसते आणि आजच्या दिवशी अशा महिलांना ज्या की आपल्याच भगिनी आहेत , ज्यांचे नवरे वारलेले आहेत , त्या विधवा आहेत , अशा महिलांच्या हाताने या वटवृक्षाची लागवड करण्यात आली. वडाचे झाड तोडून त्याची पूजा करण्यापेक्षा वडाला जीवनदान देणे म्हणजेच वटवृक्ष लावणं हे केव्हाही उत्तम ही संकल्पना जिजाऊ ब्रिगेड मार्फत राबविण्यात आली. त्याचबरोबर  प्रत्येक वर्षी जर एका महिलेनं एक झाड लावलं तर निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे तो समतोल संतुलित होईल.


 आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगलं होईल आणि सर्वांना शुद्ध हवा भेटेल कारण वडाचे झाड हे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे अगदी गौतम बुद्धाच्या काळापासून या झाडाला महत्त्व प्राप्त झालेला आहे. त्यामुळे या झाडाचे जतन करू या ,  गुरुवार दि.२४ जुन रोजी वटपौर्णिमा दिवशी एक नवीन झाड लावून हा सण साजरा करूयात ,  असा नारा देत जिजाऊ ब्रिगेड तर्फे वृक्षाची लागवड करण्यात आली.


 यावेळी लोहाराचे तहसीलदार संतोष रुईकर , जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष रंजना हासुरे,न्यू व्हिजन संचालिका सविता जाधव, जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्ष गोकर्णा कदम, जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्षा प्रतिभा परसे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुवर्णा कुंभार सुमन  कोळी आदीसह महिला आरोग्य , आधिकारी  , कर्मचारी उपस्थित होते.
 
Top