नळदुर्ग ,दि .२४ :
सोलापूर- हैदराबाद या उस्मानाबाद जिल्ह्यातून गेलेल्या चारपदरी राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनाचे नुकसान होवुन वाहन चालकास मोठी कसरत करावी लागत आहे. तर अनेकाना मुक्का माराचा प्रसाद मिळत आहे. यामुळे वाहनधारकांना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्या निषेधार्थ व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार दि. 24 जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खड्डयामधे वृक्षारोपण करुन गांधीगीरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले.
टोल कंपनी, गुत्तेदार व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे व निकृष्ट कामामुळे तलमोड ते खानापूर दरम्यान या महामार्गावर प्रचंड मोठ मोठे खड्डे पडलेले असून यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वारंवार अपघात घडत आहेत.
सदर महामार्गावरील सर्व उड्डाणपूलांची कामे पूर्ण करावीत, खड्डे बुजवून महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याबाबत महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे निवेदनाद्वारे वारंवार तक्रारी करण्यात आल्या.परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही सर्व कामे अर्धवट व निकृष्ट झाली. त्याचे गंभीर परिणाम वाहनधारक व प्रवासी याना भोगवे लागत आहे.
याचा निषेध नोंदविण्यासाठी व प्रशासनाला जागे करण्यासाठी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हासचिव जोतिबा येडगे, नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख, शहरसचिव प्रमोद कुलकर्णी, शहरसंघटक रवी राठोड, मनविसे शहरसचिव आवेज इनामदार, दिलीप राठोड, संदीप वैद्य यांनी अणदूर ता. तुळजापूर येथे महामार्गावरील खड्डयामध्ये वृक्षारोपण केले.