मुरुम,  दि. १८  : 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित आषाढी वारी निमित्त ' विवेकाची वारी ' या तीन दिवशीय ऑनलाईन व्याख्यानमालेचा काल दुसरा दिवस होता. काल १७ जुलै २०२१ रोजी सुप्रसिद्ध किर्तनकार डॉ. सुहास फडतरे महाराज (कोरेगाव, सातारा) यांचे ' अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संताचा जागर ' या विषयावर व्याख्यान पार पडले.



डॉ. फडतरे महाराज म्हणाले, “ वारीमध्ये फक्त देव प्रसन्न व्हावा म्हणून लोक पायी चालत नाहीत. वारीमध्ये संतांच्या विचारांचा जागर होतो. समाजाचं नेमकं प्रबोधन होण्यासाठी आणि अंध परंपरेची जळमटे दूर करण्यासाठी आम्ही विविध संत साहित्य गात पुढे जातो. पंढरपूर हे संताच्या विवेकी विचारांचे माहेर आहे आणि तेथे सर्व संतांचे विचार आम्हाला मिळतात म्हणून आम्ही ही वारी करतो.”


फडतरे महाराजांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर, संत पैगंबर, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत गाडगेबाबा यांच्या विवेकशील साहित्याच्या वारसाचा आढावा घेतला. “ अनेक ईश्वर नाहीत, एकच ईश्वर आहे आणि तो म्हणजे विठ्ठल, एकेश्वरवादामुळे अंधश्रद्धा संपते. ज्या भक्तीला विवेकांची जोड नाही आणि विज्ञानाचा आधार नाही, ती भक्ती अंधश्रद्धा म्हणून नावारूपाला येते. शोषण, व्यसनाधीनता, स्वैराचार, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा या सर्व सामाजिक रोगांच्या विरोधात संतांनी विचार दिले आहेत. देव प्राप्त करण्यासाठी वैदिक कर्मकांडाच्या अंधश्रद्धा संतांनी नाकारल्या, ” अशी वारकरी संप्रदायाची भूमिका त्यांनी मांडली. 

संत साहित्यामध्ये गरीब-श्रीमंत ही विषमता सुद्धा समोर येते. याचे उदाहरण देताना फडतरे महाराज हे संत नामदेवांचा एक अभंग सांगतात, ' तुम्हा घरी चोळी लुगडी, आम्हा घरी पोरे उघडी ; तुम्हा घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर   घूशी. ' “ संतांचे साहित्य वैदिक कर्मकांडाला फाटा देऊन समतावादी पर्याय देते आणि फक्त नामस्मरणातून ईश्वरप्राप्तीचा मार्ग समजावून सांगितला. जो ज्ञानाचा द्वेष करतो, जो आळशी असतो ते अंधश्रद्धेला बळी पडतात. या समाजाला अज्ञानी ठेवून लूट केली जाते. म्हणून या समाजाला ज्ञानी करण्यासाठी संत पुढे आले पण त्यांनी चमत्कार केले नाहीत, त्यांनी प्रबोधन केले, ” असं शेवटी फडतरे महाराज म्हणाले.    


फडतरे महाराजांनी स्वता:च्या आयुष्यातील अनुभव आणि उदाहरणे देऊन आपण संत साहित्याच्या प्रेरणेने अंधश्रद्धेचा सामना कसा केला, याच्या प्रेरणादायी आठवणी सुद्धा सांगितल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वराज आणि महेश धनवटे यांनी संत सावता माळी यांचा अभंग सादर केला. सम्राट हटकर यांनी प्रास्तविक केले. रामभाऊ डोंगरे यांनी परिचय करून दिला. सुजाता म्हेत्रे यांनी सूत्रसंचालन केले. निशा भोसले यांनी आभार मानले.
 
Top