नळदुर्ग , दि .२२: सुहास येडगे 

नळदुर्ग नगरपालिकेची सत्ता चुकीच्या माणसाच्या हातात गेल्याने शहर विकासापासुन दहा वर्षे मागे गेले आहे. आगामी निवडणुकीत शहरवासीयांनी पुन्हा अशी चुक न करता योग्य माणसांच्या हातात नगरपालिकेचा कारभार सोपवावा असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी नळदुर्ग नगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकीत बोलतांना केले. 


उस्मानाबाद - लातुर - बीड स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे आमदार सुरेश धस हे सध्या या तीनही जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये जाऊन विकास कामसंदर्भात आढावा बैठका घेत आहेत. दि.२१ ऑगस्ट रोजी आमदार सुरेश धस यांनी नळदुर्ग येथील नगरपालिकेत आढावा बैठक घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी व ॲड. व्यंकटराव गुंड हे उपस्थित होते. 

आमदार सुरेश धस यांचे नगरपालिकेत आगमन झाल्यानंतर प्रारंभी शहर भाजपाचे अध्यक्ष पद्माकर घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार धस यांचा सत्कार केला. यानंतर न.प.सभागृहात न.प.च्या वतीने नगरसेवक नय्यर जहागिरदार, उदय जगदाळे, शाहाबाज काझी,मुश्ताक कुरेशी,बसवराज धरणे यांनी आमदार धस यांचा सत्कार केला. यावेळी आढावा बैठकीत नगरसेवक तसेच नागरीकांनी समस्यांचा पाढा वाचला. राहिमनगर मधील युवकांनी आमच्या भागात गेल्या वीस वर्षांपासुन रस्ते व गटार नसल्याची तक्रार केली तर नगरसेवकांनी नगराध्यक्षा विकास कामे करण्यात अपयशी ठरल्या असुन एकाच कामाच्या अनेकदा निविदा काढुन न.प.चा पैसापाण्यात घालण्याचे काम केले असल्याचा आरोप केला आहे. यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी म्हटले की सध्या अस्तित्वात असलेल्या डम्पिंग ग्राऊंडचा विस्तार वाढवुन तो सात एकर जागेवर उभा करून ओला तसेच सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. त्याचबरोबर शहरांतील शेतकऱ्यांसाठी नगरपालिकेने रोहयो ही योजना राबवुन शेतकऱ्यांना शेततळे, विहिरी देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करावे. नगरपालिकेला रोजगार हमी योजनेअंतर्गत ही कामे करता येतात. प्रधानमंत्री आवास योजना नगरपालिकेने यशस्वीपणे राबवावी.जे लाभार्थी गायरान, गावठाण किंवा सरकारी जागेवर राहतात व ज्यांच्याकडे आठ--अ चा उतारा नाही अशांना नियमानुसार ३२५ स्क्वेअर फुट जागेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ देता येतो. 

शहरात सध्या ४०० लाभार्थ्यांकडे आठ--अ उतारा नसल्याने त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुर झालेल्या घरकुलाचा लाभ मिळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. पुढच्या आठवड्यात यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लाऊन या ४०० लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवुन देऊ असे त्यांनी म्हटले. सध्या शहरांतील समस्या पाहता शहर विकासापासुन दूर गेल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत शहरांतील नागरीकांनी योग्य माणसांच्या हातात नगरपालिकेचा कारभार द्यावा असे आमदार धस यांनी म्हटले आहे. यावेळी नगरसेवक नय्यर जहागिरदार यांनी न.प.च्या कारभारावर कडाडून हल्ला केला. नगरपालिकेत कोट्यवधी रुपये पडलेले असताना शहरात एकही विकास काम होत नाही ही दुर्दैवाची बाब असुन गेल्या पाच वर्षात शहरात कुठलीच विकास कामे झाली नसल्याने शहराची मोठी हानी झाली असल्याचे त्यांनी म्हटले. 


यावेळी शाहाबाज काझी यांनीही न.प.च्या कारभारावर संताप व्यक्त केला. या बैठकीस नगरसेवक दयानंद बनसोडे, नगरसेविका छमाबाई राठोड, भारती बनसोडे, भाजपाचे सुशांत भुमकर,भाजपाचे शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, शहर भाजयुमोचे अध्यक्ष श्रमिक पोतदार, धीमाजी घुगे, बबन चौधरी, यांच्यासह लोहारा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री शिंदे, न.प.चे कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.
 
Top