चिवरी , दि .४ : राजगुरु साखरे
बालाघाटच्या डोंगर रांगेत निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी देवीची आकाडबोने यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता उपाय म्हणून ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टच्या पुढाकारातून रद्द करण्यात आली आहे,
दि. 30 जुलै रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद असल्यामुळे चिवरी येथील महालक्ष्मीचे मंदिरही बंद ठेवण्यात आले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली आकाडबोन यात्रा रद्द करण्याची सलग दुसरा वर्ष असून, यात्रा रद्द झाल्याने भाविकांतुन व व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे,
सोलापूर हैदराबाद महामार्गावरील अणदुर पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेले प्रसिद्ध महालक्ष्मी देवीचे मंदिर असून नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश , तेलंगणा , कर्नाटक, आदी राज्यातील लाखो भाविक, देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येतात, येथे वर्षभर मंगळवार ,शुक्रवार अमावस्या, पौर्णिमा,भाविकानी गर्दी करतात . दरवर्षी देवींजीची माघ महिन्यातील पोर्णिमेपासुन येणाऱ्या पहिल्या मंगळवारी आणि आषाढ महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी मोठी यात्रा भरते. यंदा मात्र दि. ६ रोजी श्री महालक्ष्मी देवीचे आकाडबोन यात्रेमधील सर्व धार्मिक विधी रूढी व परंपरा या स्थानिक पातळीवर मोजक्याच मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले जाणार आहेत. त्यामुळे यात्रा काळामध्ये श्री महालक्ष्मी मंदिर बंद असल्यामुळे गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी घरीच देवीजींच्या प्रतिमेची स्थापना करून पूजाअर्चा नैवेद्य दाखवून आकाडबोन यात्रा घरीच साजरी करावी असे आवाहन ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.
यासाठी सरपंच घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, पोलीस पाटील रुपेश बिराजदार, तलाठी डी एन गायकवाड, जयपालसिंह बायस, अनिल गायकवाड आदीसह महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.