श्री तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया पुर्ण ; गोकुळ शुगर इंडस्ट्रीजला कारखाना डिस्लरीसह भाडेतत्वावर देण्याबाबत अखेरशिक्का मोर्तब
नळदुर्ग, दि. २९ : शिवाजी नाईक
नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना सन 2012 - 13 यावर्षीच्या गळीत हंगामापासून बंद आहे. त्यामुळे हा कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेला. कामगार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय निर्माण होऊन प्रचंड हाल झाले. हा कारखाना दिर्घ कालावधीसाठी( १५ वर्ष ) भाडेतत्वावर देण्याबाबत दि. 14 सप्टेंबर 2021 रोजी तुळजाभवानी कारखान्याचे आवसायक एस.पी. रोडगे यांनी जाहिरात प्रसिध्द केली. त्यानुसार के.डी. सोनवणे कंन्सट्रक्शन भोर पुणे, गोकुळ शुगर इंडस्ट्रिज धोत्री, कंचेश्वर शुगर लि. मंगरुळ, युवा कलेक्शन फर्म सोलापूर असे 4 टेंडर आले. बुधवार दि. 29 सप्टेंबर रोजी पुणे खेथील साखर आयुक्त कार्यालयात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यापुढे टेंडर उघडण्यात आले.
यावेळी आयुक्त कार्यालयातील संचालक (प्रशासन) इंदलकर, सोलापूर आर.जे.डी. दराडे यांनी प्रक्रिया पुर्ण केली. यावेळी साखर आयुक्त यांनी निविदा धारकांनी जास्तीत जास्त दर भरलेल्या संस्थेस गोकुळ शुगर यांना भाडेतत्वार चालविण्याबद्दल सुचना केली. व पुढे मंजुरीस्तव हा अहवाल सहकार मंत्री मुंबई यांच्याकडे पाठविले आहे. या प्रसंगी उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेचे प्रतिनिधी म्हणुन नाईकवाडे व जाधव हे अधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर , जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार आवसायक एस.पी रोडगे, आर.जे.डी. सोलापूर दराडे यांच्यासह साखर आयुक्त यांचा पाठपुरावा व प्रयत्नांमुळे अखेर तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया बुधवारी पुर्ण होऊन हा कारखाना लवकरच सुरु होणार असल्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी तुळजापूर लाईव्हशी बोलताना सांगितले.
दरम्यान श्री तुळजाभवानी कारखान्याचे फिटर असलेले कर्मचारी विठ्ठल माने यांनी बोलताना आनंद व्यक्त करुन सांगितले कारखाना बंद पडल्यामुळे कामगार व त्यांच्या कुटूंबियांची प्रचंड हाल झाली असून कारखाना भाडेतत्वावर दिल्याने लवकरच कारखाना सुरू होणार आहे. व कामगारांच्या हाताला परत काम मिळावे एवढीच अपेक्षा आहे.
ऊस उत्पादक शेतकरी संजय दशरथ जाधव या निर्णयाचे स्वागत केले आहे. ऊस गाळपासाठी आपला हक्काचा कारखाना सुरु होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना ससेहोलपट आता थांबणार आहे.