मुरुम, ता. उमरगा, . २४ :
देशाला प्रदूषणमुक्त, शक्तीशाली व समृध्द बनविण्यासाठी पाण्याचे नियोजन, पर्यावरणाचे संवर्धन, परिसर स्वच्छता, महिलांची सुरक्षितता, आरोग्य संवर्धन करण्यासाठी युवकांनी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने पुढाकार घेण्याचे आवाहन उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील यांनी केले.
गणेशनगर, ता.उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ' ग्रामस्वच्छता, जलसंवर्धन व आरोग्य संवर्धनासाठी युवा वार्षिक विशेष शिबीरा ' प्रसंगी गुरूवारी (ता. २४ ) रोजी उद्घाटक म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व उपस्थित मान्यवरांनी श्रमदान केले. यावेळी गणेशनगरच्या सरपंच उषा चव्हाण, उपसरपंच सतीश पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माणिक राठोड, पोलीस पाटील कलावती चव्हाण, नगर शिक्षण विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ. सतीश शेळके, मुख्याध्यापक सुभाष राठोड, सहशिक्षक शाहूराज माने, संजय चव्हाण आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना सचिन पाटील म्हणाले की, वाढती लोकसंख्या, प्रदूषण व आरोग्य आदी कारणामुळे शहरीकरणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रचंड मोठया प्रमाणात होत असलेली जंगलतोड यामुळे विविध समस्यांना तोंड दयावे लागत आहे. आपला भाग दुष्काळाच्या छायेत असल्याने पाण्याची बचत करुन त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. जलसंधारणांची कामे करण्याकरिता तरुणांनी पुढाकार घेऊन लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे शेवटी ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी सपाटे म्हणाले की, श्रमदान हेच श्रेष्ठदान असल्याने सर्व तरुणांनी पुढाकार घेऊन हा परिसर स्वच्छ करावा. संस्कारयुक्त पिढी निर्माण करणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य आहे.
प्रा. डॉ. संध्या डांगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. महेश मोटे, डॉ. विलास खडके, विद्यार्थी प्रतिनिधी अमितकुमार बनसोडे, लता कांबळे, योगेश पांचाळ, अंजीवनी स्वामी, अमोल कटके, संतोष कांबळे, आकाश पांचाळ, नामदेव शिंदे, अक्षय कांबळे, श्रावण कोकणे, प्रभाकर महिंद्रकर आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवी आळंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी मानले.