उस्मानाबाद.दि. 22 :
वात्सल्याचे आरोग्य क्षेत्रातील काम हे दखल घेण्या योग्य असेल.संस्थेने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हा प्रयत्न करावा.शासकीय यंत्रणेसोबत आरोग्य क्षेत्रात वात्सल्य करत असलेले हे काम नक्कीच कौतुकास्पद आसल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.
वात्सल्य सामाजिक संस्थेच्या रुग्णवाहिकेचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी जिल्हाधिकारी दिवेगावकर हे बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, मोतीलाल ओसवाल फाउंडेशनचे अमित कोल्हे वात्सल्यच्या अध्यक्षा प्रणीता शेटकार आदी उपस्थित होते.
वात्सल्य सामाजिक संस्था गोशाळा,एकल महिला,वृक्ष लागवड आणि संगोपन,सेंद्रिय शेती,आदी विषयात काम करते.संस्थेने मंगरूळ ता. तुळजापूर आणि परिसरात केलेल्या सर्वेक्षणानुसार रुग्णवाहिकेची गरज असल्याचे लक्षात आले होते.संस्थेची सामाजिक कामातील ही धडपड पाहून संस्थेचे हितचिंतक डॉ.रविराज खोगरे यांच्या सहकार्याने मोतीलाल ओसवाल फाउंडेशन कडून संस्थेला टाटा विंगर ही अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिका मिळाली आहे.या माध्यमातून संस्था आरोग्य शिबिरे,फिरता दवाखाना,अत्यवस्थ रुग्णास दवाखान्यापर्यंत पोहोचवणे,रक्तदान शिबिरास सहकार्य,आरोग्य जागृती,असे उपक्रम राबवणार आहे.मोतीलाल ओसवाल फाउंडेशन नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असते,त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून संस्थेला ही रुग्णवाहिका मिळाली आहे.