काटी , दि . २४ : उमाजी गायकवाड


 तंत्रशिक्षणामध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘गेट’ (ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग) या परीक्षेत तुळजापूर तालुक्यातील काटी येथील गवंडी काम आणि नागनाथ मंदीरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या ज्ञानेश्वर नागनाथ खरात यांचा मुलगा शिवम खरात याने पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन ॲन्ड टेक्नॉलॉजी या कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 2021 मध्ये उत्तीर्ण झाला. 
   


 राष्ट्रीय स्तरावरील ‘गेट’ या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत आणि आय.आय.एस.सी. आणि आय.आय.टी. या उच्च तंत्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेमध्ये 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत एक लाख विद्यार्थी बसलेले होते. या  परिक्षेत जवळपास दहा हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामधून 369 व्या रॅंकने  शिवम खरातने घवघवीत यश संपादन करीत देशातील 23 आय.आय.टी.कॉलेजपैकी मागील पाच वर्षांपासून प्रथम क्रमांकावर असणाऱ्या मद्रास  आय.आय.टी. कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्ससाठी निवड झाली आहे.
      

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. आपल्याकडे जिद्द, चिकाटी आणि आपल्या प्रयत्नांना कठीण परिश्रमाची जोड दिल्यास असाध्य गोष्ट सिद्ध करता येते. हे शिवम खरातने सिध्द करून त्याचे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे दाखवून दिले आहे. लातूरमधील शाहु कॉलेज मध्ये बारावीत असताना फक्त सातवीपर्यंत शिक्षण घेतलेले त्याचे वडील ज्ञानेश्वर खरात घरची परिस्थिती प्रचंड हलाखीची असल्याने स्वतःला शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे आपल्या मुलावर अशी परिस्थिती येऊ नये म्हणून मुलाला खुप शिकवण्याची इच्छा बाळगून ते लातूर मध्येच राहुन त्याच्यासाठी हाताने स्वयंपाक बनवत असत. शिवमचे वडिल सातवीपर्यंत तर आई सुनिता यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून वडील येथील नागनाथ मंदीराचे पुजारी म्हणून व उर्वरित वेळेत ते गवंडी काम करत आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या या गरीब परिस्थितीची जाणीव ठेवून शिवमने जिद्द, चिकाटी, आणि स्वतः च्या अभ्यास पद्धतीवर विश्वास ठेवत, हलाखी परिस्थिती डोळ्यासमोर ठेवत आपले उचित स्थान प्राप्त करण्यासाठी कठीण परिश्रमाच्या जोरावर गेट परिक्षेत देशात 369 व्या रॅंकने उत्तीर्ण होत  यश संपादन केले आहे. 


त्याने पुण्यात एसीई मध्ये ऑनलाईन क्लास लावले होते. तसेच त्यास विद्यासरिता ॲकॅडमीचे प्रा. राज शेखर यांचे मार्गदर्शन लाभले. गेट परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची आणि उच्च करिअरची दारे खुली होत असतात आणि "पब्लिक सेक्टर" मधील कंपन्यांमध्ये त्यास आता चांगल्या पगाराची आणि उच्च पदांची नौकरीची संधी मिळणार आहे. 
       
 
Top