मुरूम, ता. उमरगा, दि. १८
येथील बसव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा मंगळवारी (ता. १७) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात थाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील , उद्घाटक केसरजवळगा विरक्त मठाचे विरंतेश्वर महास्वामी होते. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, शिवसेना तालुका उपप्रमुख चंद्रशेखर मुदकण्णा, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, कंटेकुरचे सरपंच गोविंद पाटील, बसव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शरण पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानने संपूर्ण महाराष्ट्रातून वंचितांना न्याय देण्याचे प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल संस्थेचे विशेष कौतुक केले. प्रतिष्ठानने गेल्या पाच वर्षांमध्ये जे कार्य केले ते सर्वोत्कृष्ट असल्याचे ते म्हणाले. यावेळी दिलीप भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. विरंतेश्वर महाराजांनी यावेळी बसवेश्वरांनी प्रतिकूल काळामध्ये जे कार्य केले आहे. ते निश्चितच तरुणांना प्रेरणादायी असून तरूणांना दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये अंकुश मंडले, आनंद देशट्टे, सुहासिनी चव्हाण, आनंद मोरे, रुपचंद ख्याडे, तनुजा ख्याडे, पंडित शर्मा, बाबा जाफरी, बबनराव बनसोडे, परवेज सौदागर, महादेव नायकूडे, निर्मलकुमार लिमये, सोनाली पाटमासे, अभय भालेराव, सुरेश खरात, कांतीलाल शर्मा, डॉ. सत्यजित डुकरे, उमाकांत देशपांडे, मनिषा माने, माधुरी समुद्रे, भाग्यश्री घोडके, डॉ. लींबाणाप्पा मुदकण्णा, भारतबाई सुरवसे आदींचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल, हार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कल्याणी येवले, दत्ता अनंतपूरे, भगवान कांबळे, चंद्रकांत गोडबोले, शंकर सोलापूरे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामलिंग पुराणे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे तर डॉ. शीला स्वामी यांनी आभार मानले. यावेळी शहर व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.