नळदुर्ग ,दि.३०
स्मशान भूमी नसल्याने संतप्त नातेवाईकानी चक्क गावातील ग्रामपंचायत कार्यालया समोर अंत्यविधी उरकल्याने परिसरातील ग्रामस्थामध्ये जजोरदार चर्चा होत आहे. हि घटना तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे घडली आहे. मालु लिंगा दुधभाते वय ८० यांचां अंत्यविधी शनिवारी ३० जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय समोर करण्यात आला.
याबाबत घटनास्थळाहुन मिळालेली माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे गावाजवळ असलेल्या हमिद कुरणे यांच्या शेतात २०१६पुर्वी बांधलेली स्मशान भूमी पाडण्यात आली.तेंव्हापासून हा वाद सुरू आहे.२०१६ पासून गावांमध्ये मृत्यू झाला तर पोलिस संरक्षणात अंत्यविधी होत आहेत. परंतु शनिवार दि.३० जुलै रोजी गावकऱ्यांनी आम्हाला आमच्या पुर्वीच्या ठिकाणी अंत्यविधी करु दया आशी भुमिका घेतली.
संबंधित शेतकऱ्याच्या शेताच्या मधोमध हि जागा असल्याने व याबाबत कुठलीही नोंद सातबारा उता-यावर नसल्याने शेतकऱ्याने स्व:ताची जागा रस्त्याच्या कडेला दिली होती.परंतु काही लोकांच्या मते दिलेली जागा शाळेच्या शेजारी व गावाच्या जवळ असल्याने आम्हाला पुर्वीची जागा मिळावी आशी मागणी केली होती.
दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थामध्ये उलटसुलट चर्चा होत आहे.
याप्रकरणी महसुल विभागाशी संपर्क साधला असता स्मशानभुमीची सातबारा उता-यावर नोंद असल्याचे बोलताना तहसिलदार सौदागर तांदळे यानी सांगितले .