तुळजापूर, दि ०९ डॉ. सतीश महामुनी
महाराष्ट्रातील विस्थापित जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यात आली आहे, शेतकरी कामगार शिक्षण आरोग्य आणि सहकार या पंचसूत्रीवर स्वराज्य संघटना राज्यभर काम करणार आहे सत्ताधारी लोकांकडून प्रश्न सोडवण्यात हलगर्जीपणा झाला तर स्वराज संघटना आगामी काळात राजकारणामध्ये प्रवेश करणार असल्याचे छत्रपती संभाजी महाराज यांनी तुळजापूर येथे जाहीर केले.
जय भवानी जय शिवाजींच्या जयघोषात स्वराज पक्षाच्या लोगो आणि झेंड्याचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज या संघटनेचा लोगो आणि ध्वज याचे विमोचन करण्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्यभरातून आलेले प्रमुख स्वराज्य संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रारंभी तुळजापूर येथील स्वराज्य संघटनेचे आबासाहेब कापसे व महेश गवळी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वागत केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. सभेच्या प्रारंभी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्यसमन्वयक महेश गवळी यांनी प्रास्ताविक केले.
तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर झालेल्या जाहीर सभेमध्ये स्वराज्य संघटनेची संकल्पना आणि विचार सांगताना माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य संघटनेची पंचसूत्री समजावून सांगितली. संघटनेचा झेंडा भगवा ध्वज आणि पक्षाचा लोगो याचा अर्थ कार्यकर्त्यांना समजून सांगितला. बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी सांगितलेले विचार, या संघटनेसाठी मार्गदर्शक असतील छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जे उद्देश डोळ्यासमोर ठेवले होते. त्यांना समोर ठेवून स्वराज्य संघटना आगामी काळात महाराष्ट्रात काम करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यासाठी आपण स्वतः दौरे करणारा असून चिरंजीव युवराज शहाजीराजे हे देखील या कामाला पुढे घेऊन जाणार आहेत.
विविध विषयावर छत्रपती संभाजी महाराज यांनी बोलताना तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेश देण्यावरून जो वाद निर्माण झाला होता. त्याविषयी आपण जास्त बोलणार नाही तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे, असे सांगून पश्चिम महाराष्ट्रात वाया जाणारे पुराने वाहून जाणारे पाणी मराठवाड्यासारख्या आवर्षणग्रस्त भागाला देण्यासाठी आजपर्यंत का प्रयत्न झाले नाहीत असा सवाल त्यांनी राज्यकर्त्यांना विचारला.
बारा बलुतेदार आणि बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आपण यापूर्वी राज्यभर शिव शाहू दौरा केला समाजाचे प्रश्न एकत्र केले आहेत. 18 पगड जाती आणि बारा बलुतेदार यांच्या न्याय हक्काच्या कल्याणासाठी आणि मराठा आरक्षण कायमस्वरूपी मिळवण्यासाठी आपण ही लढाई चालवलेली आहे. स्वराज संघटना निश्चितपणे राज्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी आपली भूमिका बजावणार आहे. कायमस्वरूपी टिकणारे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला आपण पाठिंबा देणार आहोत. त्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळवून द्यावे असे आवाहन केले.
आपल्या खासदारकीच्या उमेदवारीवरून बोलताना शिवबंधन बांधण्यावरून आपणाला दगा दिला गेला शब्द फिरवला गेला म्हणून आपण खासदारकी नाकारली त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. अनेक दिवसापासून मंत्रिमंडळ नव्हते. त्यामुळे जनतेचे प्रश्न रेंगाळत पडले आहेत. शासनामध्ये प्रत्येक दिवस महत्त्वाचा असल्यामुळे महत्त्वाचे निर्णय पार पाडण्यासाठी जलद गतीने कामकाज करावे असे आवाहन देखील त्यांनी या सभेत केले.
तत्पूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य संघटनेच्या स्थापने प्रसंगी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेतला मंदिरात त्यांनी दर्शन घेतले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा सत्कार तुळजापूरकरांच्या वतीने करण्यात आला जीवनराजे इंगळे, प्रशांत अपराध ,अजय साळुंखे, प्रशांत सोनजी ,सज्जन साळुंखे ,मयूर कदम यांच्यासह इतर स्थानिक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. या सभेमध्ये पद्माकर चव्हाण यांनी स्वराज्य संघटनेसाठी 9822 रुपयांचा धनादेश छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे सुपूर्त केला. प्रवक्ते करण गायकर यांनी याप्रसंगी प्रास्ताविक केले आणि राजेंद्र कांबळे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील पोवाडा सादर केला.