चिवरी , दि . ०७: राजगुरु साखरे:
तुळजापूर तालुक्यातील येवती परिसरात मागील एक महिन्यापासून पडत असलेल्या संततधार पावसाने नुकसान झालेल्या पिकांची प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.
यंदा मृग नक्षत्रात पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्या उशिरा झाल्या, आणि अपुऱ्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. मात्र मागील एक महिन्यापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे जमिनीत अतिओलावा निर्माण होऊन सोयाबीन, उडीद, तूर पीक जागेवरच पिवळे पडून सुकून गेले आहेत. अनेक शेतात पाणी साचून सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार येवती शिवारात दिनांक ६ रोजी तलाठी अनिल काळे, कोतवाल मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष समाधान ढोले, आप्पासाहेब बडुरे, नितीन तांबे, आकाश बडुरे यांच्या उपस्थिती पंचनामे करण्यात आले.