अणदूर , दि . २७:
जो पर्यंत महिला सक्षम होणार नाही तो पर्यंत खऱ्या अर्थाने देशाचा विकास साधला जाणार नाही .महिलांना सक्षम करायचे असेल तर त्यांचे हक्क , अधिकाराची माहिती , निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सहभाग, आहार व आरोग्य शास्त्र ,कायद्याबाबतचे प्राथमिक ज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती यावर वैचारिक मंथन घडवून आणण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त थोर समाजसेवक डॉ.सिद्रामप्पा खजुरे यांच्या संकल्पनेतून जागर महिला मंडळ अणदुर यांच्या वतीने दि. 28 ऑगस्ट रोजी "महिला सक्षमीकरण आणि वास्तववाद " या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे तर उद्घाटक म्हणून तहसीलदार सौदागर तांदळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर परिसंवादातील सहभागी वक्ते म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर , विधीज्ञ अँड.शुभदा पोतदार , सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा गुंड ,जवाहर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या प्रा . डॉ . अनिता मुदकण्णा आदी सहभागी असणार आहेत .तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेवाप्पा आलुरे , भगीरथ कुलकर्णी यांची उपस्थिती असणार आहे .अणदूर येथील हुतात्मा स्मारक सभागृहामध्ये संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सिद्रामाप्पा खजुरे व जागर महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.