शहरातील महत्वाच्या विविध मागण्यासाठी मनसेचा मोर्चा


नळदुर्ग, दि.११ :


 नियोजित नळदुर्ग शहराला  तालुक्याचा दर्जा द्या,तूर्तास अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित करा,महावितरणचे प्रस्तावित असलेले उपविभागीय कार्यालयास मंजूरी देऊन सुरू करा, शहराला २४ तास पाणी पुरवठा करणाऱ्या प्रस्तावित योजनेस मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया सुरू करा, उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांची भरती करा, शहरातील बंद पडलेले शासकीय विश्रामगृह पूर्ववत सुरू करावे अशा विविध मागण्यासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि १ सप्टेंबर २०२३ रोजी किल्ला गेट ते बसस्थानक पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.



जिल्हाधिकारी  मार्फत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पाणी पुरवठा मंत्री, ऊर्जा मंत्री,आरोग्य मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आदीना  निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही ही पाठविण्यात देण्यात आले आहे. 


जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नियोजित  नळदुर्ग तालुक्याचा २१ पानी अहवाल या अगोदरच्या सरकारकडे सादर केला आहे.  जवळपास नळदुर्ग शहर व परिसरातील ६० गावातील लोकांची मागणी गेल्या ४० वर्षापुर्वीपासुन आहे. नळदुर्ग शहर हे एक ऐतिहासिक शहर असून पूर्वी निजाम राजवटीत येथे सुभा, मामलेदार कचेरी, मुन्सफ कोर्ट असा दर्जा होता.ज्या ज्या वेळेस जिल्हा व तालुका पुनर्रचना समित्या शासनाने स्थापित केल्या, त्या त्या समितीने नळदुर्गला भेट देऊन पाहणी करून अत्यंत कमी खर्चात तालुका होण्याचा अहवाल शासनाकडे सादर केला होता,परंतु गेल्या ३ दशकाहून अधिक काळ येथील लोकांच्या भावनेचा व गरजेचा विचार झाला नाही. त्याचबरोबर सन २०१९ मध्ये नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे तत्कालीन सरकारने प्रस्ताव मागवला होता.त्याचे पुढे काय झाले,तूर्तास अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित करून नागरिकाना  सोयी सुविधा उपलब्ध करुन दयावे,  त्याचबरोबर अनेकवेळा महावितरणचे उपविभागीय कार्यालय सुरू होण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता,तो शासन दरबारी धूळखात पडला असून त्यास मंजुरी देऊन उपविभागीय कार्यालय सुरू करावे,तसेच बोरी धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा असताना ही ८ - १० दिवसाआड शहरात पाणीपुरवठा केला जात आहे,शहराला २४ तास पाणी पुरवठा करणाऱ्या प्रस्तावित योजनेस मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया सुरू करावी. जेणे करून शहरवासीयांची अनेक वर्षाची २४ तास पाणी मिळण्याची प्रतीक्षा संपेल,त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांची भरती करावी,कारण त्या रिक्त पदांमुळे अनेक रुग्णांना इतरत्र हलविण्याची वेळ येत आहे,इतक्या सुसज्य इमारतीमुळे शहराला सौंदर्य लाभले आहे, याठिकाणी आरोग्य नगरी होईल,त्या दृष्टीने रिक्त पदांची भरती तात्काळ करावी. तसेच नळदुर्ग येथे शासकीय विश्रामगृह आहे,त्याची अवस्था भूत बंगल्यागत झाली आहे,या विश्रामगृहामुळे येणाऱ्या पर्यटकांची व भक्ताची मोठी सोय होणार असल्याने या विश्रामगृहाची तात्काळ दुरुस्ती करून पूर्ववत सुरू करावे,आदी मागण्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार निवेदने देण्यात आली आहे, मागण्या पूर्ण झाल्यास  शहर व  परिसरातील जवळपास दीड लाख लोकांना याचा फायदा होईल असे मनसेने दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.


 शासनाचे  लक्ष वेधून घेण्यासाठी या मागण्या संदर्भात दि १ सप्टेंबर २०२३ वार शुक्रवार  रोजी किल्ला गेट ते बसस्थानक पर्यंत विराट असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सचिव जोतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, विधानसभा अध्यक्ष मयूर गाडवे,तालुका सरचिटणीस गणेश पाटील,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवि राठोड आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top