संविधानामुळेच देशातील तमाम नागरिकांना उपेक्षित बहुजनांना त्यांचे मानवी हक्क मिळाले: एस.के.गायकवाड
वागदरी,दि.२६:
सामाजिक, राजकीय धार्मिक, शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करून भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच देशातील तमाम नागरिकांना उपेक्षित बहुजनांना त्यांचे मानवी हक्क मिळाले असून देशाची राष्ट्रीय एकात्मता अबाधित आहे.असे प्रतिपादन रिपाइं (आठवले) चे जिल्हा समन्वयक तथा पत्रकार सामाजिक कार्यकर्ते एस.के.गायकवाड यांनी वागदरी ता.तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
वागदरी ता.तुळजापूर येथे ग्राम पंचायतीच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी एस.के.गायकवाड हे बोलत होते.
प्रारंभी सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर, उपसरपंच सुरेखा भालचंद्र यादव, यांच्या शुभहस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक रीत्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी मिटकर गुरुजी, ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, मिनाक्षीताई बिराजदार, विद्याताई बिराजदार,रोजगार सेवक रामसिंग परीहार, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते चंद्रकांत वाघमारे,सादु वाघमारे,ग्रा.प.कर्मचारी ओंकार चव्हाण,आकाश झेंडारे सह ग्रामस्थ उपस्थित होते.