खोटा देखावा आणि फसवणुकीच्या तावडीत ग्राहक
(राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष २४ डिसेंबर २०२४)
ग्राहकांची फसवणूक ही अशी समस्या आहे, ज्याला आपण दररोज कळत-नकळत बळी पडतो, पण अनेक वेळा माहीत असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा फारसे गांभीर्य दाखवत नाही, उलट त्याचा खूप खोलवर परिणाम होऊन संपूर्ण अर्थव्यवस्थेला हानी पोहोचते. वाहनांचे इंधन जे सामान्य माणूस दररोज वापरतो, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती आणि मोजमापावर होणारा संशय सर्वसामान्यांना नेहमीच त्रास देतो. पुष्कळशा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर गाडीच्या टायरमध्ये हवा भरताना तेथील कर्मचारी हवा तपासण्यासाठी पैसे घेतात, जेव्हाकी पेट्रोलच्या दरात काही सेवा मोफत दिल्या जातात. जसे - शौचालयाचा वापर, पिण्याचे पाणी, तक्रार पुस्तिका, वाहनाचा टायरमधे हवा, इंधनाचे मोजमाप तपासणे, प्रथमोपचार किट, आपत्कालीन कॉल. या सेवा पेट्रोल पंपावर मोफत देणे बंधनकारक आहे अन्यथा अशा पंपांवर ग्राहकांच्या सेवेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली जाऊ शकते. या सेवांचे शुल्क पेट्रोल विक्रेत्याच्या कमिशनमध्ये जोडल्यानंतरच आपल्याला पेट्रोल विकले जाते.
भारतात दरवर्षी २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. २४ डिसेंबर १९८६ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी ग्राहक हक्क कायदा मंजूर केला. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’म्हणून साजरा केला जातो. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार, प्रत्येक भारतीय ग्राहकाला संरक्षण, माहिती, निवड, म्हणण्याचा, तक्रार व निवारण आणि ग्राहक हक्क शिक्षण असे सहा अधिकार मिळाले आहेत. आपण आधुनिक जगाच्या त्या टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे सर्वत्र स्पर्धा आणि संघर्ष दिसतो. केवळ बाह्य आवरण सुंदर करून उत्पादने विकण्याचा ट्रेंड आहे. ग्राहकही वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी गुणवत्तेऐवजी प्रमाणाला प्राधान्य देतो, पण पैसे खर्च करण्याचा तुलनेत ग्राहकाला योग्य उत्पादन मिळत आहे का?
आजच्या काळात भेसळ आणि उत्पादनांची खालावली गुणवत्ता उच्च पातळीवर आहे, आजच्या काळात कोणत्याही वस्तूची हमी देणे फार कठीण आहे. दशकभरापूर्वी, आपण वाहने, उपकरणे, यांत्रिक उपकरणे, गृहोपयोगी उपकरणे किंवा त्यांचे सुटे भाग हमीपेक्षा जास्त काळ टिकणारे पाहिले, परंतु आता अशा कमकुवत उत्पादनांची निर्मिती केली जात आहे जणू त्यांना भविष्यच नाही. महागाईनुसार उत्पादनांच्या किमती गगनाला भिडतात, पण गुणवत्तेच्या नावाखाली ते कुठेही टिकत नाहीत, अल्पावधीतच वस्तू निरुपयोगी ठरतात. पूर्वी ग्राहकांना मर्यादित साधनांमधून गुणवत्ता मिळत असे, आता बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या अमर्याद संसाधनांमधून गुणवत्ता शोधूनही ती दिसत नाही.
देशभरात सायबर गुन्हे शिगेला पोहोचले आहेत, दररोज अनेक प्रकरणे पाहिली आणि ऐकली जातात, आपल्याला एसएमएसद्वारे बनावट वेबसाइटच्या लिंक पाठवल्या जातात, अनेक फेक कॉल्स आणि ईमेल्स येतात. देश-विदेशातील नवीन नंबरवरूनही व्हॉट्सॲपवर मेसेज येतात. आपल्या डिजिटल उपक्रमांची माहिती नोंदवली जाते, या डिजिटल युगात आपली वैयक्तिक माहिती जगभर पसरलेली आहे. आजकाल डिजिटल अटकेच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ७५८०० प्रकरणांसह सायबर फसवणुकीच्या घटनांची संख्या ४२१.४ कोटी रुपयांवरून वाढून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २०५४.६ कोटी रुपये झाली. २०२४ च्या पहिल्या चार महिन्यांत, भारतीयांना सायबर गुन्हेगारांमुळे १७५० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले, राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर ७४०,००० तक्रारी दाखल झाल्या. ७६००० बनावट वेबसाईटच्या माध्यमातून ८ लाखांहून अधिक लोक ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरले आहेत. नवनवीन पद्धती वापरून स्कॅमर्समुळे ऑनलाइन फसवणूक वाढत आहे.
सर्व सोशल मीडियाने त्यांचा दर्जा आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी कठोर नियम केले आहेत, तरीही त्यांची अंमलबजावणी सक्षमपणे होत नाही. सर्वसामान्यांच्या चांगल्या पोस्टला स्कॅम ठरवून डिलीट केल्याचे अनेकदा दिसून येते, जेव्हाकी सोशल मीडिया फसव्या जाहिराती आणि अयोग्य पोस्टने भरलेला असतो. ऑनलाईन उत्पादन शोधत असताना, बनावट वेबसाइट देखील दिसते, ज्यावर उत्पादनाच्या खोट्या किमती दाखवून ग्राहकांची खुलेआम फसवणूक केली जाते. अशा खोट्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर बंदी का नाही? अशा वेबसाइट्सच्या भ्रामक जाहिराती आणि स्वस्त किमतींमुळे लोक अनेकदा फसतात.
जीवरक्षक औषधेही आता जीवघेणी बनली आहेत; ग्राहकाने कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही? आशिया खंडातील सर्वात मोठ्या रुग्णालयात गणल्या जाणाऱ्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील हजारो रुग्णांना नुकतेच बनावट औषधांचे वाटप करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील औषधी व्यापारात बनावट औषधांचा वाटा १० टक्के आहे, बनावट औषधांची जागतिक बाजारपेठ २०० अब्ज डॉलरची आहे आणि यापैकी ६७ टक्के बनावट औषधे मानवी आरोग्यासाठी धोकादायक मानली जातात. भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार, भारतातील ५ टक्के औषधे बनावट आहेत. एसोचैम ने २०२२ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील २५ टक्के औषधे बनावट किंवा अत्यंत कमी दर्जाची आहेत.
क्रिसिल आणि ऑथेंटिकेशन सोल्युशन प्रोव्हायडर्स असोसिएशनच्या संयुक्त अहवालात म्हटले आहे की देशात विकल्या जाणाऱ्या सर्व उत्पादनांपैकी सुमारे २५-३० टक्के बनावट उत्पादने आहेत. बनावट वस्तू पोशाख ३१ टक्के, एफएमसीजी २८ टक्के आणि ऑटोमोटिव्ह २५ टक्के सर्वात जास्त प्रचलित आहे, हे शीर्ष विभाग आहेत जेथे ग्राहकांना बनावट उत्पादने जास्त आढळतात, त्यानंतर २० टक्के फार्मास्युटिकल्स, १७ टक्के ग्राहक टिकाऊ वस्तू, १६ टक्के कृषी रसायने आहेत. फिक्की च्या मते, औषधे, मसाले, बेबी फूड, मिनरल वॉटर, सॉफ्टवेअर, सिगारेट, मद्य, सोन्याची बिस्किटे आणि लक्झरी वस्तूंसह बहुतेक उत्पादनांच्या श्रेणींमध्ये बनावट उत्पादने आढळू शकतात. फिक्की कॅस्केडने अहवाल दिला आहे की बनावट उत्पादनांमुळे वार्षिक करांचे नुकसान कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचा अंदाज आहे. बनावट ऑटो पार्ट्सचा २० टक्के रस्ते अपघातांमध्ये योगदान आहे आणि भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन प्रतिजैविक औषधांपैकी एक बनावट आहे. जर कधी आपण देशी तूप, मध, केशर यांसारखे खाद्यपदार्थ विकत घेतो तेव्हा लोक म्हणतात की ते शुद्ध घेतले नसावे, याचा अर्थ लोकांचा आपल्यापेक्षा बाजारातील भेसळीवर जास्त विश्वास असतो.
केवळ आपली जागरूकता आणि तत्परता या सर्व समस्यांना आळा घालू शकते. सेवा, तिकिटे, दागिने किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करताना ग्राहक हक्कांची जाणीव ठेवा. उत्पादन खरेदी करताना, सरकारने निर्देशित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा. कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, वस्तूंवर प्रकाशित केलेली माहिती वाचा, शक्य असल्यास वस्तूंची चाचणी घ्या आणि प्रमाणित केंद्रातूनच खरेदी करा. खरेदीचे निश्चित बिल मिळवा. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसह उत्पादने खरेदी करणे टाळा. उत्पादनाशी संबंधित समस्यांच्या बाबतीत, विक्रेत्याशी बोला, विक्रेत्याने विहित नियमांनुसार मदत न केल्यास, अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा आपल्याला मदत करण्यास नेहमीच तयार आहे. ग्राहक व्यवहार विभाग, भारत सरकारच्या https://consumerhelpline.gov.in/public/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन तक्रारी नोंदवू शकता. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन १८००११४००० किंवा १९१५ या क्रमांकावर कॉल करू शकता. आपण व्हॉट्सॲपद्वारेही संपर्क करू शकता, ८८००००१९१५ या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपण एनसीएच किंवा उमंग ॲप डाउनलोड करूनही मदत घेऊ शकता. सायबर फसवणुकीच्या बाबतीत, नॅशनल सायबर क्राइम पोर्टल www.cybercrime.gov.in किंवा सायबर क्राइम हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधा. ग्राहक न्यायालये विशेषत: ग्राहक हक्क संरक्षणासाठी आहेत. सर्व मंत्रालये, विविध विभाग, रेल्वे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांच्या संबंधित क्षेत्रातील ग्राहकांना तक्रारीच्या बाबतीत न्याय देण्यास वचनबद्ध आहेत. याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्था, संगठन, मंच इत्यादी ग्राहक सेवेत मदत करतात.
लेखक डॉ. प्रितम भि. गेडाम
prit00786@gmail.com