हाडामासांची जिवंत मायबाप कळत नाहीत त्यांना संत काय कळणार ? -हभप. दिपक महाराज खरात 

धाराशिव,दि.०५

आपली काळजी घेण्यासाठी भगवंतांनी आई पाठवली परंतु या जिजाऊंच्या महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आश्रमं निघालेली आहेत. हाडामासांची जिवंत मायबाप कळत नाहीत, त्यांना संत काय कळणार? यांनी दोन खोल्यांमध्ये लेकरा बाळासह आपला संसार केला, पण आज दोन मजली इमारती असूनही आई-वडिलांना ठेवू शकत नाहीत ही खंत व्यक्त करून आई वडील असतानाच काळजी घ्या. नंतर खर्च करत बसू नका. त्यांनी आपल्यासाठी ओल्या अंतकरणाने भरभरून केले. तुम्ही कोरड्या अंतकरणांतरी करा. असा मौलिक हेतूपदेश सकल संत सेवा समिती धाराशिवमार्फत चालू असलेल्या संत तुकाराम महाराज चरित्र कथेत हभप दिपक महाराज खरात यांनी बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात केला.


प्रत्येक कथेतून संस्कारित मुले होण्यासाठी महाराज आई-वडिलांविषयी आवर्जून उपदेश करतात आणि ही काळाची गरज आहे. व कथेच्या प्रारंभि संत गोरोबाकाका ,भगवान कालेश्वर ,प्रभू श्री रामचंद्र, श्री हनुमानजी ,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, व येथील सर्व देवतांना वंदन करून कथेला सुरुवात करत असतात .
३१ डिसेंबरच्या कथेत संत तुकाराम महाराजांच्या घरातील दुःखद प्रसंग, व त्याकाळी महाभयानक पडलेला दुष्काळ सांगताना त्यांचे सह उपस्थित भाविकांचा कंठ दाटून आलेला होता व भाव विश्वातील अश्रू डोळ्यातून पाजरत होताना दिसत होते .


आमच्या देशामध्ये माऊलीं, तुकोबाराय, गोरोबाकाका  शिवरायांसारखे राजे, महाराणाप्रताप असे अनेक शूर जन्मले. वशिष्ठ आणि व्यास देवांसारखे अनेक ऋषी - मुनी जन्मले म्हणून आमच्या इथली ही परंपरा अजूनही समाधानाने पुढे जाते आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवून आहे. अन्यथा काय काय झाले असते?
 असे सांगून भाविक श्रोत्यांना ज्ञानगंगेत स्नान करविताना पुढे सांगतात की,
तुकाराम महाराजांचे आई-वडील गेल्यानंतर घरात मोठी पोकळी निर्माण झाली होती. सावजी हे वडील बंधू होते. पण त्यांचेही प्रपंचात लक्ष नव्हते ते सिद्धेश्वराच्या  मंदिरात ध्यानस्थ बसत होते. सावजीच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर घराचा त्याग करून देव शोधण्यासाठी निघून गेले होते. माणसा माणसांमध्ये देव शोधणाऱ्या तुकोबांना मना -मनात जना- जनात क्षणा-क्षणात सर्वत्र देव दिसत होता. त्या काळात पडलेल्या दुष्काळात अन्ना वाचून माणसे मरत होते, पाऊस नव्हता ,जमिनीला भेगा पडलेल्या होत्या, घरातले अन्न संपल्यानंतर झाडांचा पाला खाण्याची वेळ आली होती, शेवटी शेवटी झाडांच्या मुळ्याही खाण्यासाठी माणसे तयार झाले, जलचरांचे पाण्यामुळे प्राण जाण्याची वेळ आली होती, गोठ्यातली वासरं हंबरडा फोडू लागली. अशा प्रसंगी तुकोबा आदलीने, पायलीने धान्य देऊ लागले.

 देहू मध्ये तुकाराम महाराज करणा सारखे उभे होते. जे माणसे मागायला आले नाहीत त्यांच्या घरी जाऊन धान्य देत होते. समाजात असलेल्या आपल्या पति वर बाजारातून उधारीने धान्य आणून वाटू लागले. घरातल्या कणगीतील धान्य  पत्नीचा विरोध असताना ही वाटून टाकले. इतिहासात महाराष्ट्रातल्या दुष्काळाच्या अनेक नोंदी आहेत. अशा प्रसंगी तुकाराम महाराजांची पत्नी गेली, मुलगा  ही आजारी पडला. तुकोबारायात हतबल होऊन महादजी पंत यांच्या गळा पडून रडू लागले. त्यावेळी महादजी पण  बोलले "तुकोबा.. आपल्यावर वेळ आल्यावर कोणीही जवळ येत नसतं ."
अशा  प्रकारे तुकाराम महाराजांच्या घरातला दुःखद प्रसंग ,व त्यात दुष्काळ याचे वर्णन करताना महाराजांचाही कंठ दाटून आलेला होता. व सर्व भाविक वर्ग त्या प्रसंगात भयान शांत झालेला होता. व भावना हेलावणारे संगीताची ध्वनी चालू होती. अशा प्रकारे या कथेतून महाराजांनी पटेल ,रुजेल, समजेल असे कोमल आणि पवित्र शब्दधन वाटून टाकले.पसायदानाने कथेची सांगता होऊन ,शेवटी सर्वांनी महाप्रसादाचा  आस्वाद  घेतला.

प्रसिद्धी प्रमुख --
राजेश बिराजदार.
 सकल संत सेवा समिती धाराशिव.
 
Top