नळदुर्ग,दि.१६:
नगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराने कळस गाठल्याने नागरिकांना पाणी पुरवठ्यासह मुलभुत सुविधा देण्यास न.प.प्रशानाच्या विरोधात आज सोमवार दि.१६ जुन रोजी गाढव मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसुन जनतेच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्नासाठी असुन शहरवासीयांनी ऐतिहासिक किल्ला गेट येथुन सकाळी 10:30 निघणा-या या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नळदुर्ग शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले यांनी केले आहे.
शहरातील पाणी प्रश्नाप्रकरणी रविवार दि.१५ जुन रोजी रात्री ८ वाजता चावडी येथे व्यापारी , प्रतिष्ठित नागरिक,
सर्व पक्षीय कार्यकर्तेसह, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.यावेळी अनेक मान्यवरांनी न.प.प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे जनतेला नाहकच वेठीस धरले जात असल्याचे सांगून वारंवार पाणी पुरवठा दिर्घ काळ विस्कळीत होत असल्याने माता भगिनीचे हाल होत आहेत. त्याचबरोबर शहर स्वच्छतेबाबत अनेकदा न.प. प्रशासनास सांगुन देखील त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असुन भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी , न.प. प्रशासनाचे लक्ष वेधून जनतेला वेळेवर सुरळीतपणे सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----------------------