बकरी ईद नियमांचे काटेकोर पालन करून उत्साहात साजरा करावा ; जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
धाराशिव दि.४ :
येत्या ७ जून २०२५ रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद सण नियमांचे काटेकोर पालन करून उत्साहात साजरा करावा.तसेच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्यात यावी,असे निर्देश धाराशिव जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बकरी ईद २०२५ अनुषंगाने आज घेण्यात आलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाय.बी.पुजारी,नागरी विभागाचे जिल्हा सहआयुक्त अजित डोके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ मधील सुधारणा लागू करण्यात आली असून,४ मार्च २०१५ पासून राज्यात संपूर्ण गोवंश हत्या बंदी लागू आहे.त्यामुळे गाय, बैल,वळू यांची कत्तल होणार नाही,याची दक्षता घेणे आवश्यक आहे.असे त्यांनी स्पष्ट केले.
म्हशी व म्हशीचे पारडे यांची कत्तल करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगून श्री.पुजार म्हणाले की,पशूंच्या कानात 'ई-घर टॅग' असणे आणि भारत पशुधन प्रणालीवर त्यांची नोंदणी असणे बंधनकारक आहे. संबंधित अधिकाऱ्यांनीच कत्तलीसाठी योग्य कारण देऊन प्रमाणपत्र द्यावे.जनावरांची वाहतूक करताना आरोग्य प्रमाणपत्र आणि वाहतूक परवाना बंधनकारक असून,अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी प्रत्येक तपासणी नाक्यावर (चेक पॉईंटवर) योग्य कारवाई करण्यात यावी.यासाठी पशुसंवर्धन विभागाने पोलिस,महसूल,परिवहन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधावा,असे निर्देशही श्री.पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की, सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सर्वांची जबाबदारी आहे.प्राण्यांच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे,असेही त्यांनी नमूद केले. बैठकीस विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी,पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.