बोरगावच्या सरपंचपदी कविता कांबळे यांची बिनविरोध निवड 

नळदुर्ग,दि.११ : 

बोरगाव ( तुपाचे) ता. तुळजापूर येथील सर्वसाधारण जागेवरील विद्यमान सरपंच सौ. अर्चना मोहन माने यांनी साडे चार वर्षे कारभार केला आणि उर्वरित काळासाठी आपल्याच पॅनल मधील अनु. जाती प्रवर्गातील पण सर्वसाधारण जागेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या सौ. कविता गौतम कांबळे यांना सरपंच होण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला.

 आणि दि. ८ जुलै रोजी सरपंच पदाची निवडणूक पार पडली. त्यात सौ.कविता गौतम कांबळे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली. यावेळी  निवडणूक अधिकारी म्हणून  ए .सी.कावळे विस्तार अधिकारी ( पं) पंचायत समिती तुळजापूर हे उपस्थित होते. सहायक म्हणून ग्रामसेवक  संजय नवगिरे होते.  माजी सरपंच अशोक बोरगावकर, उपसरपंच लक्ष्मण पाटील, ग्रामपंचायत सदस्य  राम कलकुटे, सौ. वंदना सुतार, माजी सरपंच अर्चना माने, बसवंतराव मुळे, सौ. कविता कांबळे, आदीसह गावातील प्रतिष्ठित नागरिक  अप्पवराव मुळे, दत्तात्रय साळुंखे, काका पाटील, मोहन माने , बाबुराव पाटील, अरविंद गायकवाड,मारुती बनसोडे, राहुल जाधव, गौतम कांबळे, शैलेंद्र सोनकांबळे, आशिष जाधव, लहू सोनकांबळे, लक्ष्मण कांबळेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

सरपंच निवडीनंतर छत्रपती शिवाजी महाराज, म. बसवेश्वर यांच्या पुतळ्याला हार घालून गावातून मिरवणूक काढण्यात आली व शेवटी भिमनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घातल्यानंतर नूतन सरपंच सौ. कविता गौतम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अर्चना मोहन माने, मोहन माने  , मारुती बनसोडे यांची भाषणे झाली.
 
Top